पुणे : कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.तर दुसऱ्या महिलांवर अन्याय झाल्यावर तत्परतेने पुढे येणाऱ्या आ.विद्या चव्हाण याच सुनेचा छळ करत असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान,या वादात अतिशय आक्रमक भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी घेतली होती. मात्र आता चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विलेपार्ले पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. डॉ. गौरी यांनी आपल्याला दुसरी मुलगी झाली झाली म्हणून सासरच्या मंडळींनी आपला छळ सुरू केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला आहे. कौटुंबिक हिंसाचारासोबत विद्या चव्हाण यांच्या दुसऱ्या मुलानं आपला विनयभंग केल्याचा आरोपही त्यांनी या तक्रारीत केला आहे.
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना प्रसिद्धी मिळत असल्याने त्यांना आता भान राहिलेले नाही. ते आपल्या प्रत्येक भाषणात महिलांविरोधात बोलत असतात. त्यामुळे अशा महाराजाविरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्यास आम्ही अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी घेतली होती तसेच यासंबंधी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रारही केली.
इंदुरीकर महाराजांवर टीका करण्यात सर्वात पुढे असणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी चव्हाण यांचीच बाजू घेतली आहे. ‘विद्या चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. चव्हाण यांचे कुटुंब सुशिक्षित आहे. ते असे काही करणार नाहीत. केवळ राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. तसेच त्यांची ही केस सध्या कौटुंबिक न्यायालयात सुरु आहे, जे सत्य असेल ते लवकरच समोर येईल,’ असे मत रुपाली चाकणकर यांनी मांडले आहे.


