इंफाळ: इंफाळ येथे झालेल्या मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एन बिरेन सिंग यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने घेतलेला हा एक चांगला निर्णय असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. “यामुळे मणिपूरमध्ये एक स्थिर आणि जबाबदार सरकार तयार होईल. कारण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आज ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष देत आहे”, असेही सीतारामन यावेळी म्हणाल्या.
शनिवारी एन बिरेन सिंग म्हणाले होते की मी कधीही मुख्यमंत्री किंवा इतर कोणत्याही पदासाठी निवडणूक लढवली नाही परंतु भाजपचा कार्यकर्ता म्हणून, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा योग्य तो निर्णय घेतील. नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात मागील सरकार स्थापन केले आणि तेव्हाही बीरेन सिंग मुख्यमंत्री होते. यावेळी मणिपूरमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी संभाव्य पर्याय म्हणून भाजपचे आमदार टी विश्वजित सिंह यांचे नावही चर्चेत होते.
मतदानानंतर भाजपने चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली. यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि किरेन रिजिजू यांची मणिपूरसाठी नियुक्ती करण्यात आली होती. आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून एन बिरेन सिंग यांची मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी एकमताने पुनर्निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

