नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात आज (27 ऑक्टोबर) सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतरची ही पहिलीच सुनावणी आहे. विशेष म्हणजे ज्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात स्थगिती दिली होती त्याच खंडपीठापुढे ही सुनावणी होत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. सरकार वकील मुकूल रोहतगी कोर्टात अनुपस्थित आहेत. यावर खासदार संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“हे दुर्दैव आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्याला विचारतात की कुठे आहेत सरकारी वकील, तेव्हा ते तिथे हजर नसतात. आपले सरकारी वकील तिथे उपस्थित नव्हते हे दुर्दैवं आहे, गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव जिथे कुठे असतील त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करा,” अशी विनंती संभाजीराजेंनी केली.
“मराठा समाजाला तुम्ही अशा पद्धतीने गृहित का धरायला लागले आहेत का? त्यांच्याशी खेळखंडोबा करायला लागले आहेत. हे बरोबर नाही. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की सर्वोच्च न्यायालयात समाजाचं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी जी केस सुरु आहे तिथे वकिलांना पोहोचवावं. आमचा वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण आपली बाजू तिथे मांडणं महत्त्वाचं आहे,” असेही संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, बेंचने हा विषय घटनापीठाकडे दिला त्यामुळे ही सुनावणी घटनापीठाकडे व्हावी अशी आमची मागणी आहे. काही लोक विनाकारण राजकारण करत आहेत, ज्यांना सरकारवर विश्वास नाही त्यांनी स्वतःचा वकील लावावा अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
दुसरीकडे स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात यावर सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती एल.एन.राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणावर सुनावणी होत आहे. यावेळी सरकारकडून वकील मुकूल रोहतगी, अभिषेक मनू सिंगवी, कपिल सिब्बल बाजू मांडतील. तर विनोद पाटील यांच्या वतीने वकील संदीप देशमुख बाजू मांडतील. तर राज्य सरकारकडून वकिल पी एस पटवलीया बाजू मांडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लातूर जिल्ह्यातील 11 कोविड केअर सेंटर रुग्ण नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय
- पंकजाताईंवरील गुन्हा हा तर सत्तेचा गैरवापर अन् राजकीय जळफळाट; प्रीतम मुंडेंचा घणाघात
- आमच्यावर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी स्वतःचा वकील लावावा – अशोक चव्हाण
- खासदार सुजय विखेंच्या प्रयत्नातून नगर-मनमाड महामार्गासाठी साडेचारशे कोटींचा निधी!
- नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले शेतकऱ्यांच्या बांधावर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

