जळगाव : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
राजकीय पक्षांच्या पुरस्कृत पॅनलचा विचार केला तर शिवसेना व भाजप यांच्यात जोरदार चुरस रंगली आहे. तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस देखील मोठ्या प्रमाणात यश मिळवताना पाहायला दिसत आहेत. माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर या विधानसभा मतदारसंघ तालुक्यात भाजपने चांगलं यश मिळवलं आहे. या निकालांवर त्यांनी भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, ‘जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ८५ ते ९० टक्के यश आले आहे. महाविकास आघाडीला जामनेर तालुक्यात फारसं यश प्राप्त होणार नाही. जामनेर तालुक्यातच नाही तर जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी पक्षाच्या ताब्यात राहतील. उर्वरीत महाराष्ट्रात देखील भाजपला चांगलं यश मिळेल’ असा विश्वास देखील गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- शेतकरी लाखोंचा पोशिंदा, मात्र केंद्र सरकार त्यांचा अपमान करतंय – अजित पवार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामकरणातील योद्ध्यांचा आठवले करणार सत्कार
- राधाकृष्ण विखेंच्या भाचीने राष्ट्रवादीच्या गडाला दिला हादरा; काकडीमध्ये भाजपची सत्ता
- कर्नाटकातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, येडियुरप्पा यांची कोल्हेकुई सुरूच


