मुंबई: पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊन अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच आहे, पण तो पूर्णत्वास कसा नेणार? ‘आझाद कश्मीर फाईल्स’ चित्रपट निर्माण करून व त्याबाबतचा प्रचार करून, त्या प्रचारावर निवडणुका जिंकून पाकव्याप्त कश्मीर ‘आझाद’ होणे शक्य नाही. मुख्य म्हणजे सैन्याची तयारी करावीच लागेल. लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य आपण अद्याप बाहेर काढू शकलेलो नाही. दहशतवाद जसा पाकिस्तानचा आहे, त्यापेक्षा जास्त चीनचा आहे. त्याचा विसर पडलेले लोक नवे संकल्प सोडत आहेत. कश्मिरी पंडितांचे व कश्मीरचे राजकारण थांबवून पुढचे पाऊल कधी टाकणार ते सांगा! असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.
पाकव्याप्त कश्मीर ‘आझाद’ करण्याचा संकल्प मोदी सरकारने सोडला आहे. ज्याप्रमाणे कश्मीरातून 370 कलम रद्द केले, त्याचप्रमाणे पाकच्या ताब्यात गेलेला कश्मीरचा भूभाग परत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारच्या या भव्य राष्ट्रीय संकल्पाबद्दल आम्ही सगळेच आनंदाने गदगदून गेलो आहोत व त्या सुवर्ण दिवसाची वाट पाहत आजपासूनच राहिलेले दिवस ढकलीत आहोत. केंद्र सरकारने हा संकल्प सोडला असेल तर त्यास विरोध करण्याचे कारण नाही. उलट मोदी सरकारला त्या भव्य कार्यासाठी जमेल तसे उत्तेजनच द्यायला हवे. जितेंद्र सिंह हे ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहून इतके भारावून गेले आहेत की, त्यांना आता काय करावे व करू नये असा भ्रम निर्माण झाला आहे. पाकच्या ताब्यातील कश्मीर परत यावा असे कोणत्या सच्च्या हिंदुस्थानी नागरिकास वाटणार नाही? पुन्हा श्री. मोदी यांच्यासारखे बुलंद मनाचे व जिद्दीचे पंतप्रधान गादीवर विराजमान असल्याने पाकव्याप्त कश्मीर ‘आझाद’ करण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल, याविषयी कुणाच्या मनात तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही. असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू कश्मीरचा भाग ( पीओके ) परत घेण्याबाबत 1994 मध्ये संसदेत प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानुसार हा भाग स्वतंत्र करून पुन्हा हिंदुस्थानला जोडण्याचा आमचा संकल्प असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले. कलम 370 रद्द होईल असे कुणाला वाटले होते काय? पण केंद्र सरकारने तो संकल्प पूर्ण केला. आता पुढचे पाऊल पाकव्याप्त कश्मीर आझाद करण्याच , असे आपले केंद्रीय मंत्री सांगतात, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. आता प्रश्न असा आहे की , पाकच्या ताब्यातील कश्मीर सोडविण्यासाठी मोदी सरकारला कठोर पाऊले उचलावी लागतील . त्यातले पहिले पाऊल ते कधी टाकणार? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेण्याआधी सरकारला हिंदुस्थानी कश्मीरातील बऱ्याच गोष्टी स्थिरस्थावर कराव्या लागतील. आपल्या कश्मीरात आजही अशांतता व तणाव आहे. 370 कलम हटवले हे खरे. पण त्यानंतर एकही नवा उद्योग कश्मीरात आला नाही, गुंतवणूक झाली नाही व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे कश्मीरातील तरुणांत असंतोष आहे. हजारो कश्मिरी पंडितांच्या ‘घर वापसी’चा संकल्प मोदी यांनी सात वर्षांपूर्वी सोडला होता तो अपूर्णच आहे. आपल्या पंडितांना आपल्याच कश्मीरात स्थिरस्थावर करता आलेले नाही , तेव्हा पाकव्याप्त कश्मीरचे नवे प्रश्न कसे सोडविणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! शिवसंपर्क अभियानापूर्वी वर्ध्यातील विश्रामगृहात राडा
- “… सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”- रोहित पवार
- ‘या’ योजनेअंतर्गत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन! वाचा प्रक्रिया
- मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीचा मोठा दणका; 6.45 कोटींच्या सपत्तीला लावला टाळा
- IPL 2022 : राजस्थान संघात गेल्यानंतर मलिंगा म्हणतो, “पहिली गोष्ट जी मनात आली ती…”


