जळगाव : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्या आठवड्यात कोसळले. शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केले याचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. तसचे बंड केलेले आमदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुम्ही नेमके का गेलात ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका, असा टोला संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. यावर आमदार गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.
“शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. आम्ही बंडखोर नाहीच. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही,” अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केला”, असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.
आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं –
आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या समर्थकांना यापूर्वी बोलून दाखवलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी अजूनही सावध रहावं, असा सल्ला देखील त्यांनी ठाकरेंना दिला होता. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ते आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले. त्यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करा, असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना दिला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

