अहमदनगर : भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात फारसे सक्रीय दिसत नाहीत, त्यांचे भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्या देखील अधून-मधून येतच असतात. त्यामुळे जानकर यांच्या मनात नक्की काय चाललय याची चर्चा वारंवार होत आहे. आता महादेव जानकर यांच्या एका विधानाने या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
‘आपल्याला कोणत्याही राजकीय नेत्यांची अॅलर्जी नाही, अथवा आपण कुणाला बांधीलही नाही. आता राष्ट्रीय समाज पक्षात अन्य समाजातील धर्मनिरपेक्ष लोकही येत आहेत,’ अशी भूमिका महादेव जानकर यांनी मांडली आहे. महादेव जानकर मंगळवारी राहुरी येथे आले होते. शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण गो शाळेचे अध्यक्ष ललित चोरडिया यांच्याकडे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
‘राष्ट्रीय समाज पक्षाला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. अन्य समाजातील धर्मनिरक्षेप लोकही आमच्या पक्षात येत आहेत. त्यांचे स्वागतच आहे. आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्यांची अॅलर्जी नाही, अथवा आम्ही कुणाला बांधील नाहीत,’ असे जानकर म्हणाले आहेत.
‘सत्ता ही लोक कल्याणासाठी वापरायची असते. लबाडी व जातीय तेढ निर्माण करून जास्त दिवस सत्ता टिकून राहत नाही. लोकांच्या हाताला काम पाहिजे. ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांनी आपल्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना गुलाम बनविले आहे. अनेक लोकांवर अन्याय होत आहेत. मात्र लोक तो मुकाट्याने ते सहन करतात. सरकारच्या मदतीने मोठ्या झालेल्या संस्था यांच्या खासगी असल्यासारखे ते वागतात,’ अशी टीकाही जानकर यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- …तर कोरोनाचे निर्बंध संपल्यावर जनतेचा प्रक्षोभ होईल; चंद्रकांतदादांचा गर्भित इशारा
- शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन! मोदी सरकारकडून खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय
- पालकांची प्रतिक्षा संपणार, ११ जूनपासून आरटीईची प्रवेश प्रक्रिया होणार सुरु!
- विदर्भात मान्सून दाखल; पुढील ४ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
- कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची तब्ब्येत खालावली,मेदांता रुग्णालयात करण्यात आले दाखल


