औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रोज हजाराच्या वर कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. सरकार आवाहन करून थकलंय आणि प्रशासन नागरिकांसमोर हतबल झालेय. कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढत असताना बेजबाबदार नागरिकांकडे बोट दाखवले जाते. पण ते बेजाबदार लोक कोण आहेत हे आता हळूहळू समोर येऊ लागलेय. समाजाला कोरोनाच्या संकटात लोटणारे ते महाभाग दुसरे तिसरे कोणी नसून आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच आहेत हे स्पष्ट झालेय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन लागू आहे. या नियमानूसार राजकीय कार्यक्रम, सभा, मंगल कार्यालयात लग्न लावण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. पण सगळ्या नियमांना फाट्यावर मारत पैठणच्या ढोरकीन येथे आज गुरुवारी राजकीय नेत्यांनी जिल्हा बँक निवडणुकीचा मेळावा घेतला. यावेळी मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे उपस्थित होते.

मेळावा घेतला खरा. पण यावेळी एकाही नेत्याने तोंडाला मास्क बांधला नव्हता. उपस्थित लोकांनी मास्क लावणे तर दुरच. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले नाही. एरवी सोशल मीडियातून हेच नेते लोकांना कोरोना नियम पाळण्याचे ज्ञान पाजळत असतात. मात्र, स्वत:च्या फायद्यासाठी यांना नियमांचे काहीच देणे घेणे नाही असे दिसून येतंय. हे आजचे उदाहरण नाहीये. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यापासून यासह अनेक नेत्यांनी नियमांना धाब्यावर बसवून सभा, बैठका, मेळावे घेतलेत.
सध्या बहुतांश नोकरवर्ग वर्क फ्रॉम करत आहेत. शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. परीक्षाही ऑनलाईन होत आहेत. एवढेच काय तर आजच जळगाव महापौर, उपमहौपरपदाची निवडणूक ऑनलाईनच पार पडली. मग, या नेत्यांना प्रचार ऑनलाईन करायला काय हरकत आहे असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

बरं हे झाले नेत्यांचे. एवढा मोठा मेळावा झाला. नियमांना हरताळ फासला. मग प्रशासन काय झोपेत आहे का? मास्क न लावता फिरणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन कारवाई करते आहे. प्रत्येकाकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे नियम सामान्य लोकांसाठीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या सत्ताधारी नेत्यांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का हाच खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते सत्ताधारी शिवसेनेचे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष देऊन त्यांच्या या ढाण्या वाघांना समज द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दे धक्का! पंकजा मुंडे समर्थक माजी आमदार मंत्री धनंजय यांच्या गोटात
- ‘साखर कारखान्यांवरील महिला अत्याचाराला वाचा फोड’, सिंधूताईंचा आ.धसांना सल्ला
- बीड जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून महिलांना वगळले
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
