अहमदनगर : ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काँग्रेस पाठोपाठ शिवसेना देखील आता स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागली आहे. तर, प्रभाग पद्धतीला अद्यापही काही नेत्यांचा विरोध असल्याचं समोर आलं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य करताना सहयोगी पक्षांना इशारा देखील दिला आहे.
‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग किती सदस्यांचे असावेत, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यावर चर्चा होऊन सरकारचा निर्णय झाला. आम्ही सर्वजण या सरकारचे घटक असल्यानं तो निर्णय होण्यातही आमचाही वाटा आहेच. त्यामुळं आता ठरलेली प्रभाग रचना सर्वांनाच बंधनकारक ठरते,’ अशी भूमिका जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.
यासोबतच, प्रभाग रचनेबद्दल सरकारचा निर्णय झाल्यानंतरही काँग्रेस कडून विरोध दर्शवण्यात येत असून निर्णय बदलण्यात येण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘प्रभाग रचना बदलण्यासंबंधी जेव्हा चर्चा सुरू होती, त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण चार सदस्यांचा प्रभाग हवा अशी भूमिका मांडत होते. तर काँग्रेसची दोन सदस्यांची मागणी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचेही मत दोन सदस्यीय रचना असावी असं होतं. मात्र, त्यावर चर्चा होऊन नंतर तोडगा काढण्यात आला,’ अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.
पाटील यांना स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘निवडणुका अद्याप दूर आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून नेमकी भूमिका अद्याप ठरलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. आपापल्या पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून नेते आपली मतं व्यक्त करीत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा नेत्यांना बोलावं लागतं. मात्र, हे काही अंतिम ठरू शकत नाही. आमची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आघाडी होण्यास प्राधान्य देण्याची भूमिका आहे. तसा आमचा प्रयत्नही राहील. मात्र, इतरांकडून वेगळा अग्रह सुरूच राहिला, तर आमचाही नाइलाज होईल,’ असं भाष्य करत त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला इशाराच दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- यवतमाळमधील वाहून गेलेली बस सापडली; चालकासह एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
