Share

‘लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे’

Published On: 

मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. तर, भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.

या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या १५ नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट भाजपला पिछाडी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावरून आजच्या सामना अग्रलेखातून देखील ममतांच्या या आवाहनाला पाठींबा देण्याचे बोलले आहे. ‘राष्ट्रजीवनात सर्वांना स्थान आहे. कोणीही कोणाला नष्ट करण्याचा प्रयत्न करता कामा नये, हीच हिंदुस्थानी संस्कृतीची विशेषता आहे. पण या संस्कृतीवर घाला येत आहे असे आज अनेक प्रमुख लोकांना वाटते. ममता बॅनर्जी यांनी देशभरातील सर्वच विरोधी पक्षांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले. त्यामागची मूळ भावना हीच आहे. विरोधी ऐक्यासाठी ममता यांनी सगळय़ांना आवाहन केले आहे. ‘लोकशाही रक्षणासाठी एकत्र या’ असे त्यांनी विरोधी नेत्यांना लिहिले आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भाजपप्रणीत केंद्र सरकार दडपशाहीचा अवलंब करीत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे.

ममतांचे म्हणणे असे की, हुकूमशाही प्रवृत्तीच्या भाजपने प्रत्येक राज्यात तसेच बिगर भाजपशासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या कार्यालयांचा दुरुपयोग चालविला आहे. केंद्र सरकार लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत असून दिल्ली सरकारविरुद्ध संसदेने मंजूर केलेले ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र शासन विधेयक’ हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. या विधेयकामुळे लोकशाही मार्गाने जिंकून आलेल्या केजरीवाल सरकारवर नायब राज्यपालांची हुकूमशाहीच लादली गेली आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे नायब राज्यपाल दिल्लीचे अघोषित ‘व्हाईसरॉय’ बनविले गेले आहेत.

राज्यपालांचा हा खेळ महाराष्ट्रासह अनेक राज्यांत भाजपप्रणीत केंद्र सरकारने चालवला असून हे कृत्य लोकशाही व संसदीय परंपरांचा गळा घोटणारे आहे. बिगर भाजपशासित राज्यांची आर्थिक कोंडी करणे, अनेक बाबतीत सहकार्य नाकारणे हे आता रोजचेच झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने एका छत्राखाली येऊन लढा द्यावा, असे आवाहन सध्या व्हिलचेअरवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन, नवीन पटनायक, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पण हा एकत्र येण्याचा प्रयोग प्रत्यक्षात आकार घेईल काय?

आज आपापल्या राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष ‘राष्ट्रीय’ असल्याचा तुरा मिरवीत स्वतःचे स्वतंत्र राजकारण करीत आहेत. प्रत्यक्ष प. बंगालात तृणमूल काँग्रेस व सोनिया गांधींची काँग्रेस हातात हात घालून लढत नाही. ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे एकत्र येण्याच्या प्रयोगाची सुरुवात कोलकात्यापासून होणे गरजेचे होते, पण प. बंगालातील भाजपच्या आक्रमणानंतर ममता बॅनर्जी यांना सगळय़ांनी एकत्र यावे असे वाटत असेल तर त्या भावनेचे स्वागत व्हावे. केरळ, तामीळनाडूत काँग्रेसही नाही आणि भाजपही नाही. तिकडे खेळ पूर्णपणे प्रादेशिक पातळीवर आहे.

ओडिशाचे नवीन पटनायक कायम कुंपणावरच असतात. केजरीवाल, चौताला, बिहारात तेजस्वी यादव, कर्नाटकात देवेगौडांचे जनता दल आपापला खेळ मांडत असतात. उत्तर प्रदेशात मायावती काय करतील त्याचा भरवसा देता येणार नाही, पण अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष तसा जमिनीवर पाय रोवून आहे. आंध्रातले जगनमोहन, चंद्राबाबू हे नक्की कोणत्या तळय़ात-मळय़ात आहेत ते कधीच सांगता येणार नाही. विरोधकांचा एकोपा नसल्यानेच लोकशाहीचे मातेरे झाले आहे. उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा? हिंदुस्थान हे सार्वभौम लोकशाहीवादी प्रजासत्ताक व्हावे असे आपल्या आद्य घटनाकारांना अभिप्रेत होते. त्यांनी केवळ ‘सार्वभौम प्रजासत्ताक’ असे म्हटले नाही.

आज आपल्या देशात सार्वभौम नक्की काय आहे? स्वतःचे राज्य, स्वतःचीच सत्ता हीच सार्वभौमता मानली जात असेल तर कोणत्या हुकूमशाही विरुद्ध विरोधी पक्ष लढणार आहे? प. बंगाल सध्या सगळय़ात मोठा राजकीय आखाडा बनला आहे. म्हणून त्याच भूमीवरचे गुरुदेव टागोर काय म्हणाले ते सांगतो. गुरुदेवांनी सांगितले आहे, ‘जेथे मन भयमुक्त आहे आणि माथा ताठ आहे, जेथे ज्ञान मुक्त आहे अशा त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझी मातृभूमी विराजमान होवो.’ शेवटी विरोधकांना एकत्र यायचे आहे मातृभूमीसाठीच. सध्या देश काही काळ निद्रिस्त झालेला आहे. सगळीकडे अंधःकार दाटून आलेला आहे. हा अंधार दूर व्हावा असे ममतांना वाटत असेल तर त्यांनी पेटवलेल्या दिव्याचे स्वागत !’ असे आजच्या सामना अग्रलेखात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!