मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामाचा अंतिम सामना रविवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला असून आता ते विजेतेपदाच्या जवळ आहेत. शेवटच्या सामन्यात नशीब कोणाला साथ देते, याकडे सर्वांच्या नजरा असतील. पण गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा विक्रम बघितला तर तो नेहमीच आयपीएल फायनलमध्ये जिंकत आला आहे.
हार्दिक पांड्या यावेळी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातच अंतिम फेरी गाठली. मात्र, हार्दिक पांड्यासाठी ही पहिलीच आयपीएल फायनल असणार नाही. कारणं याआधी तो चार आयपीएल फायनल खेळला आहे. यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चारही फायनल खेळताना त्याचा संघ विजयी राहिला आहे. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सपूर्वी मुंबई इंडियन्ससोबत होता, जिथे त्याने चारही विजेतेपदे जिंकली आहेत. हार्दिक पंड्याने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो यंदाच्या हंगामापर्यंत मुंबईतच खेळत राहिला. हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना २०१५, २०१७, २०१९, २०२० मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.
यंदाच्या हंगामात हार्दिक पंड्या एका संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा स्थितीत तो इतिहास रचून आपल्या संघासाठी विजेतेपद मिळवून देण्याचा तसेच आयपीएल फायनल जिंकण्याचा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
फलंदाज म्हणून हार्दिक पंड्याच्या या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हार्दिकसाठी हा हंगाम फलंदाज म्हणून सर्वोत्तम ठरला आहे. त्याने आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये ४५३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी ४५ पेक्षा जास्त आहे. हार्दिक पंड्याच्या नावावर यंदाच्या हंगामात ४ अर्धशतके आहेत.
महत्वाच्या बातम्या:


