मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाने सध्या सुरू असलेल्या घरच्या मालिकेत वेस्टइंडिजविरुद्धचे पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकले आहेत. पाकिस्तानी संघाने दमदार खेळ दाखवत पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०० धावांचे लक्ष्य ५ गडी राखून गाठले आणि विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघला १५५ धावांत गारद केले. या विजयानंतरही माजी कर्णधार इंझमाम-उल-हक संघाला सावधगिरीचा इशारा देत आहे.
तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही पाकिस्तान संघाच्या फलंदाजीबद्दल बोलता, तेव्हा मला वाटते की संघातील पाचवा क्रमांक हे सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी फक्त एका तगड्या फलंदाजाला खेळवायला हवे. सध्या आम्ही हॅरीसला संधी देत आहोत. तो नवीन असल्याने एका युवा खेळाडूला हे काम करणं खूप अवघड आहे. आपण त्याला आश्वासन द्यायला हवं पण या क्षणी संघाने या नंबरसाठी त्याच्यासोबत जावं असं मला वाटत नाही.”
“मला वाटते की ही समस्या टी-२० आणि एकदिवसीय दोन्हीमध्ये संघासोबत राहते. शान मसूद चांगली कामगिरी करत आहे. तो एक प्रतिभाशाली क्रिकेटर आहे. जर आम्ही त्याला पाचव्या क्रमांकावर आजमावले तर त्याची कामगिरी या ठिकाणी आणखी चांगली होईल. त्यामुळे खुर्शीद शाहसारख्या फलंदाजाला किंवा इतर कोणत्याही खेळाडूला त्याचा फायदा होईल. आपल्याकडे रिजवान चौथ्या क्रमांकावर आहे आणि जर शान पाचव्या क्रमांकावर खेळला तर त्याची भूमिका चांगल्या कामगिरीने सामना संपवण्याची असेल.”
पाकिस्तानने सध्या सुरू असलेल्या घरच्या मैदानावरील मालिकेत वेस्टइंडिजविरुध्द २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. परंतु इंझमामने संघाला इशारा दिला की, टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे आणि अशा खेळपट्ट्या तेथे उपलब्ध होणार नाहीत. माजी कर्णधार म्हणाला, “आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियाला जातो तेव्हा तिथे आम्हाला अशा खेळपट्ट्या मिळत नाहीत. आम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्याबाबत विचार करण्याची गरज आहे.”
महत्वाच्या बातम्या:


