नवी दिल्ली: पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आणि भाजपला मात देण्याकरता नवी रणनीती आखण्यासाठी रविवारी (१३ मार्च) रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. संघटनात्मक कमरता दूर करण्यासाठी आणि राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सोनिया गांधी यांनी नेतृत्व करावे आणि संघटनेत आवश्यक आणि व्यापक फेरबदल करावे, असे आवाहन पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी केले होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, जर काही लोकांना असे वाटत असेल की या परिस्थितीला (पक्षाच्या सध्याच्या स्थितीला) गांधी कुटुंब जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, तर आम्ही पक्षासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. आम्ही पद सोडायला तयार आहोत. मात्र, सोनिया गांधींचा हा प्रस्ताव सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी लगेच फेटाळून लावला.
या बैठकीत बोलताना राहुल गांधी म्हणाले कि, काँग्रेस पक्षाची लढाई भाजपशी आहे. त्यांच्याकडे आधुनिक निवडणूक यंत्रणा आहे. त्यामुळे काँग्रेसने भाजपच्या यंत्रणेला तोंड देण्यासाठी स्वत:मध्ये परिवर्तन केले पाहिजे. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत गांधी कुटुंबीय नेतृत्वाच्या भूमिकेतून राजीनामा देऊ शकतात या खोट्या वृत्ताचे पक्षाने खंडन केले होते. मात्र, रविवारी झालेल्या बैठकीत गांधी कुटुंबाने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

