मुंबई : सध्या सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात राज्यातल्या शाळांनी शुल्कासाठी तगादा लावला, तर पालक, अशा शाळांविरोधात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
संचारबंदी ३ मे पर्यंत वाढल्यानंतरही, अनेक शाळा पालकांकडे शुल्काची मागणी करत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. शाळांनी पालकांकडे शुल्काबाबतची मागणी करू नये याबाबतचे निर्देश ३० मार्चलाच जारी केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनाच्या संकटात संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांचे उद्योगधंदे बंद आहेत. अशा काळात सर्वांवरच आर्थिक संकट असल्याने पालकांकडील पैशाची उपलब्धता पाहता शैक्षणिक संस्थांनी व शाळांनी फी मागू नये, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केली आहे.संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतर शुल्काची मागणी केली जाऊ शकते, असं या निर्देशांत नमूद असल्याचं त्या म्हणाल्या
दरम्यान,राज्यात आज कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळून आले, तर ७ जणांचा मृत्यू झाला.पाच जण उपचारानंतर आज घरी परतले. राज्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ हजार २३६ वर पोहोचली असून आतापर्यंत १९४ जण दगावले आहेत, तर ३०० जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.


