औरंगाबाद : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.
२०१४ साली मोदी लाटेत सुद्धा निवडून आलेले राजीव सातव यांनी स्वतःहून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली. कारण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या हुशारपणाची जाणीव होती. राहुल यांच्या जीवाभावाचा आधार निघून गेल्यामुळे काँग्रेसचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
राजकीय प्रवास
राजीव हे काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री रजनीताई सातव यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी पुण्यात फर्गुसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केलेले आहे. त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव डॉक्टर आहेत. २००९ ते २०१४ या काळात राजीव सावत हिंगोलीचे आमदार होते. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ते २००८ ते २०१० या काळात अध्यक्ष होते. तर २०१० ते २०१४ या काळात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले आहे.
राहुल गांधींचे ‘जिवलग’
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. २०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात.
चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची संसदेत ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
- ‘राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते’
- ‘ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला’
- मोठी बातमी : कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

