मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय गुरवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, भाजप सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
महाविकास आघाडीच्या या निर्णयाचा भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ या सरकारला आहे, असा हल्ला पडळकर यांनी सरकारवर चढवला आहे.. तसेच ‘मी यांना जाहीरपणे विचारतो. मेवा मिळत नसेल म्हणून तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रिमंडळात मांडत नसाल, तर मी माझ्या बहुजन बांधवांकडून आपल्यासाठी लोकवर्गणीने मेवा जमा करण्याचे आवाहन करू शकतो,’ असेही पडळकर म्हणाले.
तर, या निर्णयावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे.’ असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ठाकरे सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय. आरक्षणाचा विषय सोडून देऊन दारुबंदी हटवल्यानं आनंदी व्हा असं काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगितलंय,’ असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. सरकारचा तर्क अजब असल्याची म्हणत अवैध विक्री होते म्हणून गांजा, ड्रग्ज, गुटखा, प्लास्टिकवरील बंदीही उठवणार का? असाही संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय’
- दारूबंदी : ‘जे मुख्यमंत्री जिजाऊंचे नाव घेणारे आहेत त्यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती’
- ‘या’ प्रमुख कारणांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी राज्य सरकारने उठवली
- रस्ता रोको, जेलभरो इतकेच काय महिलांनी मुंडण करून केलेली दारूबंदी ठाकरे सरकारने एका झटक्यात उठवली !
- ICCच्या नियमावलीनं गोंधळला वासिम जाफर ; म्हणाला…


