कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, अनेक तज्ञ मंडळींकडून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे त्याचबरोबर लहान बालकांसाठी राखीव बेड, पुरेसा औषधसाठा आदी वैद्यकीय सेवा-सुविधा वाढवाव्यात अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली.
मुश्रीफ पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड मुळे झालेल्या मृत्यूदराचे ऑडीट करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात यावी तसेच ज्या रुग्णांलयानी जास्त बिले घेतली आहेत अशांची तपासणी करण्यात यावी त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी डॅश बोर्ड तयार करण्यात यावा अशी सूचना करुन मे महिन्याअखेर कोरोना आजाराचा आलेख खाली येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यासाठी लवकरच ग्रामविकास विभागाच्या वतीने यंत्रसामुग्रीने युक्त अशी कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात येईल त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये यादृष्टीने शासकीय रुग्णालयांतून सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना एक वर्ष मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरु असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोविड व म्युकर मायकोसिसच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, बेड व्यवस्थापन, लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा, औषध पुरवठा, लसीकरणाची सद्यस्थिती, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील सोयी-सुविधा आदी बाबींचा आढावा घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
- आईवडील गमावलेल्या मुलांना राज्य शासनाने तीन हजार मासिक वेतन द्यावे- आ.सतिश चव्हाण
- ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार ८ रुपये प्रतिकिलो गहू , तर १२ रुपये प्रतिकिलो तांदूळ
- कार्यालयात लैंगिक छळापासून संरक्षणासाठी समिती गठीत करा, अन्यथा भरा ५० हजारांचा दंड!
- प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खेळाची मैदाने, जॉगिंग पार्क, उद्याने खुली करा, क्रीडा भारतीची मागणी!
- येत्या १ जूनपासून जिल्ह्यातील उद्योगधंदे-बाजारपेठा सुरू कराव्यात – इम्तियाज जलील


