मुंबई: अभिनेत्री कंगणा रणौतआणि शिवसेनेतील वाद आता वेगळ्या वळणाला पोहचला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना एक पत्र लिहून कंगणा रणौत वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. सध्या विधानसभा उपाध्यक्ष उपस्थित असल्यामुळे नरहरी झिरवाळ यांच्याकडे हे पत्र देण्यात आले आहे.
या पत्रात कंगना रणौत हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्या संदर्भात विधानसभेत एकमताने ठराव पारीत करावा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यांच्या या मागणी करणाऱ्या पत्रावर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबाहेरील सरकारकडे सुरक्षेची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊतांनी कंगनावर आखपाखड केली होती. आता केंद्र सरकारने तिला Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे.
सुशांतसिंगच्या प्रकरणानंतर कंगणाने बॉलिवूडमधील काही मोठ्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांंविरोधात उघडपणे बोलायला सुरूवात केल्यानंतर तिने सुरक्षा मागितली होती.दरम्यान बॉलिवूडमधील मोठे अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री ड्रग्जचं सेवन करत असल्याचा गौप्यस्फोट केला होता.त्यावरून आता वादंग सुरू झाले आहे.कंगणाने सुशांतसिंग प्रकरणावरुन सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर सुद्धा आरोप केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये ‘तनू वेड्स मनु’ ‘मणिकर्णीका’ ‘क्विन’ ‘क्रिश 3’ अशा अनेक चित्रपटांंमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने एक वादग्रस्त ट्विट केले होते, ज्यामध्ये मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशी टीका केली होती. यानंतर नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.