जालना : साधारणपणे ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ असं म्हटलं जातं, परंतु बदनापूर तालुक्यातील एका गावाच्या बाबतीत मात्र यात बदल करावा लागेल. तोही थोडाथोडका नव्हे, तर तब्बल 56 वर्षांचा. या गावाला 56 वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा आहे. आता मात्र कोणत्याही परिस्थितीत आपला हक्क मिळवायचाच असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. यासाठी 26 जानेवारीला अख्ख्या गावाने गुराढोरांसकट जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी हे गाव सोमठाण्याच्या अप्पर दुधना प्रकल्पात गेलं. गावाचं पुनर्वसन झाल्याला 56 वर्षे उलटली आहेत. पण अद्यापही हे गाव कोणत्याही ठिकाणी पुनर्वसित झाले हे प्रशासनाच्याच गावी नाही. या गावाची जालना जिल्ह्याच्या नकाशात अधिकृत नोंदच नाही. या प्रकारामुळे ग्रामस्थांना झोन चारचे दाखले मिळत नाहीत. सरकारी गलथानपणाचा दुधनवाडीकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. पण आता बस्स झालं म्हणत गावकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवायचाच चंग बांधलाय. यासाठी गावकऱ्यांनी 26 जानेवारीला गुरा-ढोरांसकट दुधनेच्या पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
अप्पर दुधना प्रकल्प 1959 ला मंजूर झाला. 1960 मध्ये प्रकल्प पूर्ण झाला. यात जालन्यातील दुधनवाडी आणि औरंगाबादच्या ढवळापुरी गावांचे पुनर्वसन झाले. प्रकल्पाला दुधनवाडीकरांनी शासनाच्या आदेशाला संमती देत स्वत:च्या जमिनी स्वखुशीने दिल्या. यानंतर गावाचं पुनर्वसन 1964 मध्ये झालं. पण गाव आजपर्यंत जालन्याच्या नकाशात आलंच नाही. आजवर कैकवेळा गावकऱ्यांनी याबद्दल तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार-मंत्री यांना निवेदने दिली, अनेक बैठका झाल्या. दुधनवाडी येथील झोन-४चा दाखला मागितला, तर प्रशासनाकडून या गावाचे अतिक्रमण झाले आहे, अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे शासनाच्या विविध सवलती, बँक कर्ज आदी या गावकऱ्यांना मिळत नाहीत.
कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने पुनर्वसन तर केलं, पण काही सरकारी बाबूंच्या भ्रष्ट कामांमुळे गावकऱ्यांना तब्बल 56 वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
चुकीचे कामे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, गाव जालना जिल्ह्याच्या नकाशावर घ्यावे, तसेच झोन-४ प्रमाणे दाखले देण्यात यावेत, या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनीच दुधनवाडीतील गावकऱ्यांनी कुटुंबीयांसह व गुराढोरांसह जलसमाधी घेऊ, अशा इशारा दिला आहे. ब्रदीनाथ पठाडे, प्रवीण पडूळ, लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह गावकऱ्यांच्या स्वाक्षरीने या बाबतचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याच्या प्रती पालकमंत्री, केंद्रीय मंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन
- अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा!: अतुल लोंढे
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- ‘ओबीसींच्या हक्कासाठी वेळ पडल्यास भाजपविरोधातही बंड करू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

