मुंबई : मागील पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे व इतर काही आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा राज्यपालांसमोर शपथविधी पार पडला. आज दिवस कृषी दिन म्हणुन राज्यभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक द्वारे माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या उपस्थितीत आज दिवंगत वसंतराव नाईक यांना विनम्रतापूर्वक अभिवादन केले.
शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व भरभराटीसाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यासमयी बोलताना दिली.
दरम्यान एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनवण्यात आल्यामुळे संपूर्ण शिंदे गटामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पसरले होते. अनेक आमदारांनी तर गाण्यावर ताल धरला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील मोठ्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेनेचेच अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेत्यांनी यावर टीकाही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :


