मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मुंबईत आझाद मैदानात मराठा विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे नुकत्याच झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे आज दुपारी मराठा आंदोलकांच्या भेटीला आझाद मैदानात गेले होते. यावेळी ते म्हणाले की, ‘मराठा समाजाचेच प्रश्न महाविकास आघाडीला सोडवायचेच नाहीत, हा विश्वास आता बसू लागला आहे. सरकारच्या वतीने कोणी दाखल घेत नाही, चर्चा सकारात्मक असल्याचा दावा करण्याचे काम सरकार करते. मराठा समाजाने किती सहनशक्ती दाखवायची? समितीचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना मराठा समाजाचे प्रश्न माहीती नाही का? मराठा समाजाला सरकारकडे भीक मागावी लागते आहे. अजून असे कटोरा घेऊन किती दिवस थांबायचे,’असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
‘रिया चक्रवर्तीला वाचवण्यासाठी वकिलांची फौज लावली होती, मात्र मराठा समाजाचे प्रश्न न्यायालयात मांडताना वकील उपस्थित राहत नाहीत. कंगणा राणावतचा बांगला तोडताना एक कोटीपेक्षा अधिक पैसे खर्च केला, मात्र मराठा समाजाच्या मुलांची घरे उभारण्यासाठी किती पैसे देऊ केले? सारथीसाठी आठ कोठी दिल्याची घोषणा केली, पण ते आठ कोठी कोणी पाहिले? माझ्या वडिलांनी ( खा. नारायण राणे) अभ्यासपूर्वक तयार केलेल्या आरक्षणाच्या मसुद्यावर फडणवीस सरकारने खात्रीचे हक्काचे आरक्षण दिले होते, मात्र ते टिकवण्याचे औदार्यही ठाकरे सरकारने दाखवले नाही,’ अशी टीका नितेश राणे यांनी केली.
‘पुढच्या वर्षी तुमचे वय वाढले म्हणून सरकारी नोकरीची संधी हातातून जाईल, तेव्हा आत्ताच वेगळ्या मार्गाने आक्रमकपणे लढा द्यायला एकत्र या. तुमच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत, आता नुसती चर्चा नको तर निर्णय हवा. एकाही मंत्र्याला, मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देऊ नका, असे केले तरच तुमचे मागणे ऐकले जाईल, नाहीतर उद्या अधिवेशन संपताच सर्व मंत्री आपापल्या गावी निघून जातील, तुमचे प्रश्न तसेच राहतील,’ असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
‘मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी अख्खी मुंबई पोलीस आणि यंत्रणा रस्त्यावर उतरते, पण तुमच्यासाठी कोण येते याचा विचार करा. मागून मिळत नाही तर सहनशक्ती का वाया घालवताय. सरकारला जोपर्यंत दाखल घ्यायला लावत नाही तोपर्यंत सरकार काहीही करणार नाही, त्यासाठी सरकारला वेगळ्या मार्गाने प्रश्न विचारलेच पाहिजेत,’ असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत’
- फडणवीस दिल्लीत जावेत अशी सर्वांसह मुनगंटीवारांचीही इच्छा; ठाकरेंची फटकेबाजी
- ‘मराठा तरुणांना आरक्षण मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करू’
- ‘रेकॉर्ड वर घ्या, मराठा समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही’
- मराठा आरक्षणाबाबत भाजपने राजकारण बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करावं – अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

