🕒 1 min read
पुणे : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेने त्यांच्या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सर्वांनाच पदे शक्य नसल्याने नाराजांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी बंदोबस्त सुरू केला आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठं यश मिळवलं होतं. मागील निवडणुकीत तब्बल ९८ नगरसेवक निवडून आणत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेतून अनेक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता यातील काही नगरसेवक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
तर, यावर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपामध्ये नगरसेवक नाराज असल्याची चर्चा फक्त पत्रकारांमध्येच आहे. कोणीतरी पुड्या सोडत चुकीच्या बातम्या पसरवत आहे. भाजपा सोडून कोणीही जाणार नाही, तर इतर पक्षातून भाजपामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, मात्र भाजपाने ही सत्ता उलथवून लावत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला होता. पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अजित पवार अनेकदा बोलून दाखवतात.
दुसरीकडे भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी या चर्चांना अफवा असल्याचं सांगत खंडन केले आहे. भाजपाचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी मुद्दाम अशाप्रकारे बातम्या पसरवत आहेत, ज्यात काही निष्पन्न होणार नसल्याचं बापट यांनी म्हटलं आहे. महापालिकेत भाजपा सत्तेच्या काळात अनेक नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करत असून शहरात विकासाची घौडदौड सुरू आहे. त्यामुळे आगामी २०२२ महापालिका निवडणुकीमध्येही भाजपा प्रचंड ताकदीनं १०० नगरसेवक निवडून आणेल असा विश्वास देखील गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले, यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपणचं नंबर वन असल्याचा दावा करत आहे. राज्यात ५ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतीवर भाजपानं सत्ता आणल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. परंतु महाविकास आघाडीला ग्रामीण जनतेने कौल दिला आहे असं सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत. ग्रामपंचायत निकालांचे दावे-प्रतिदावे केले जात असताना यातच पुण्यात एका राजकीय चर्चेने भाजपाची झोप उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे भाजपमध्ये मोठ्या बंडाळीची शक्यता, १९ नगरसेवक पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत ?
- अशोक चव्हाणांनी मराठा समाजाची फसवणूक केली; विनायक मेटेंचा घणाघात!
- गावचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच सोबत राहू; निलेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे कौतुक
- ऋषभ पंतच्या झुंजार खेळीनंतर लाडक्या बहिणीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
- पुण्यातील हॉटेलची भन्नाट ऑफर ! थाली संपवा आणि जिंका रॉयल एन्फिल्ड बुलेट !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
