🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. या लेटरबॉम्बचे राज्याच्या राजकारणात देखील मोठे पडसाद उमटत आहेत. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने काल (मंगळवारी) समितीची घोषणा केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
मात्र, या समितीच्या स्थापनेवर भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील समितीच्या अधिकारांवर व दर्जावर आक्षेप घेतला आहे. ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत.’ असं भाष्य फडणवीसांनी केलं आहे.
यासोबतच, ‘कमिशन्स ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही.आता प्रश्न निर्माण होतो,तो म्हणजे कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार?’ असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीसांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘फडणवीसांनी नवी मुंबईतील भतीजाच्या एका 300 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली होती. तेव्हा ती चांगली होती. तर, आता ते आमच्या सरकारने गठीत केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात, हे योग्य नाही. फडणवीसांची ही दुतोंडी भाषा योग्य नाही,’ अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना प्रतिबंधासाठी दररोज १० हजार चाचण्या
- ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी काही दिवसांनी शरद पवार जाणार बंगालला
- बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा : 2021-22 वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाही
- बंगाल निवडणुकीत पाठींब्यासाठी ममता बॅनर्जींचे देशातील ‘या’ नेत्यांना पत्रं
- महाराष्ट्र सरकार वाघांचं की लांडग्यांचं? आंबेडकरांचा प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

