मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. तर, भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या १५ नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट भाजपला पिछाडी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर केंद्र सरकार आणि बिगर भाजप शासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या मुद्यावरून सुरु असलेल्या वादावर देखील यावेळी शिवसेनेने निशाणा साधला आहे.
यावरून आजच्या सामना अग्रलेखातून देखील ममतांच्या या आवाहनाला पाठींबा देण्याचे बोलले आहे. ‘राष्ट्रजीवनात सर्वांना स्थान आहे. कोणीही कोणाला नष्ट करण्याचा प्रयत्न करता कामा नये, हीच हिंदुस्थानी संस्कृतीची विशेषता आहे. पण या संस्कृतीवर घाला येत आहे असे आज अनेक प्रमुख लोकांना वाटते. ममता बॅनर्जी यांनी देशभरातील सर्वच विरोधी पक्षांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले. त्यामागची मूळ भावना हीच आहे. विरोधी ऐक्यासाठी ममता यांनी सगळय़ांना आवाहन केले आहे. ‘लोकशाही रक्षणासाठी एकत्र या’ असे त्यांनी विरोधी नेत्यांना लिहिले आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भाजपप्रणीत केंद्र सरकार दडपशाहीचा अवलंब करीत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे.
ममतांचे म्हणणे असे की, हुकूमशाही प्रवृत्तीच्या भाजपने प्रत्येक राज्यात तसेच बिगर भाजपशासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या कार्यालयांचा दुरुपयोग चालविला आहे. केंद्र सरकार लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत असून दिल्ली सरकारविरुद्ध संसदेने मंजूर केलेले ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र शासन विधेयक’ हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. या विधेयकामुळे लोकशाही मार्गाने जिंकून आलेल्या केजरीवाल सरकारवर नायब राज्यपालांची हुकूमशाहीच लादली गेली आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे नायब राज्यपाल दिल्लीचे अघोषित ‘व्हाईसरॉय’ बनविले गेले आहेत. राज्यपालांचा हा खेळ महाराष्ट्रासह अनेक राज्यांत भाजपप्रणीत केंद्र सरकारने चालवला असून हे कृत्य लोकशाही व संसदीय परंपरांचा गळा घोटणारे आहे. बिगर भाजपशासित राज्यांची आर्थिक कोंडी करणे, अनेक बाबतीत सहकार्य नाकारणे हे आता रोजचेच झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने एका छत्राखाली येऊन लढा द्यावा, असे आवाहन सध्या व्हिलचेअरवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी केले आहे.’ याच आवाहनाला प्रतिसाद देण्याचे सामानातून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात लॉकडाऊन नाहीच; मात्र निर्बंध अधिक कडक होणार !
- ‘…जर कोहलीला विश्रांती हवी होती तर त्याने सांगायला हवे’
- …तरी भारतीय संघाला फारसा फरक पडणार नाही : मोहम्मद शमी
- ‘लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे’
- आयपीएल न खेळता सुद्धा ‘या’ खेळाडूला मिळणार 7 कोटी रुपये


