🕒 1 min read
पुणे : राज्यात सद्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांत कोरोना वाढीचे प्रमाण आटोक्यात आल्याने जनजीवन सुरळीत झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने कडक निर्बंध लावण्यात येत आहेत.
दरम्यान, गेली कित्येक वर्षे अनेक स्वयंसेवी संस्था सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी थुंकू नये यासाठी विविध मोहिमेतून जनजागृती करण्याचे प्रयत्न करत आहेत. याचे खरे महत्व कोरोना रोगाचा फैलाव झाल्यानंतर आपल्याला लक्षात आलं. म्हणूनच तोंडावर मास्क घालणे, वारंवार हात धुणे, योग्य व सुरक्षित अंतर पाळणे असं आवाहन अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनीच केलं.
मास्क घालण्याचं आवाहन करून पालन न झाल्याने मास्कचा नियम करून दंडवसुलीची तरतूद करण्यात आली. यातून कोट्यवधी दंड राज्यात वसूल करण्यात आला. हे सर्व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठीच होतं. दरम्यान, आता कोरोना दुसऱ्यांदा फोफावत आहे. मात्र, अनेकांना पहिल्या झटक्यातूनही अद्दल घडली नसल्याचे सद्या दिसून येत आहे.
दंड बसू नये म्हणून तोंडावर मास्क तर असतो मात्र प्रवास करताना, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना अनेक नागरिक तंबाखू, गुटखा, विमल, पान यासारखे पदार्थ खाऊन रस्त्यावर सर्रास थुंकताना दिसत आहेत. आपल्याच पैशातून सरकारने विविध सुशोभित केलेल्या वास्तूंवर देखील हे निर्लज्ज थुंकतात. मग नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपूल असो वा नव्याने सुसज्ज सेवेने दाखल झालेल्या बस असो !
फक्त कोरोनामुळेच नाही तर इतर वेळी देखील या नागरिकांना सामाजिक भान कधी येणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. स्वच्छता कामगारांना स्वतःच्या हाताने ही घाण साफ करावी लागते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आली तरी या नागरिकांना आपली जबाबदारी समजत नसेल तर यांना अद्दल घडवणे गरजेचं आहे. ज्या महाराष्ट्राच्या भूमीत हिंदवी स्वराज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशाची स्वातंत्र्यज्योत निर्माण केली. जिथे लोकमान्य टिळकांपासून ते संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महान व्यक्ती होऊन गेले, ज्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून लाखो स्वातंत्र्यसेनानींनी स्वातंत्र्य यज्ञात आहुती दिली. आजही वीरपुत्र देशाच्या रक्षणासाठी बलिदान देतात, या भूमीचे रक्षण करतात. मात्र, या भूमीची किंमत न जाणता काही नागरिक पिचकाऱ्या मारतात याहून दुर्दैव ते काय !
सर्वच नियम शासनाने कडक केल्यानंतर पाळले जाणार असतील तर मनुष्य म्हणून नक्कीच आपण लायक आहोत का ? असा प्रश्न आपण स्वतःला करायला हवा. जेव्हा प्रशासन थुंकणाऱ्यांवर हजारोंचा दंड लावेल तेव्हाच सर्व थुंकायचे बंद करतील असं अजिबात नाही. हे स्वतःच्या मनापासून आलं पाहिजे, कारण प्रशासन कुठे कुठे पुरणार ? फक्त स्टेटस ठेवून देशभक्ती होत नाही, तर त्याआधी या भूमीचे महत्व जाणून त्यासाठी काही ना काही केलं पाहिजे, किमान या भूमीवर, विविध सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर थुंकणे तरी बंद केलं पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; नागपुरात लॉकडाऊनवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
- …म्हणून जॅकी श्रॉफ यांनी घरकाम करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन केलं कुटुंबीयांचं सांत्वन
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- मोदींना कडाडून विरोध करणारे यशवंत सिन्हा राजकारणात पुन्हा सक्रीय का झाले ?
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
