🕒 1 min read
पुणे – शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून भावी काळात विद्यार्थ्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल केले.
‘पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२० ‘मध्ये पुणे जिल्हयातील गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या १०६ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, सारीका पानसरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कु-हाडे उपस्थित होते.
कोरोनाची सर्वात जास्त झळ विद्यार्थ्यांना सोसावी लागली आहे. सगळेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण काळाप्रमाणे सर्वांनी बदलले पाहिजे असे सांगून ते म्हणाले मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात कौशल्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अजूनही कोरोनाबाबतची खबरदारी विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतली पाहिजे. शाळेमध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचना उपमख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
करिअर निवडताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या… स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे या… प्रशासकीय सेवेत दाखल झाल्याने निर्णय घेता येतात… अंमलबजावणी करता येते असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. काही मुलांनी आवडीनुसार शेतीही करावी. शेतीतही चांगले करिअर करता येते, परंतु धाडस करणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रात उतराल त्यात आपल्या आई-वडिलांचे नाव करा, असे सांगून कष्ट करत रहा, नावीन्याचा ध्यास घ्या, नैतिकतेचा विसर पडू देऊ नका, प्रामाणिकपणे वागा, कुणाची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या, चांगले मित्र-मैत्रिणी निवडा, व्यायाम करा, आरोग्य सांभाळा, कितीही यश मिळाले तरी आई-वडिलांना विसरु नका असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत, त्याला विद्यार्थ्यांनी साथ द्या, असे सांगून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अजित पवार यांनी कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केले. प्रास्ताविकात शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली.शिक्षणाधिकारी सुनील कु-हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर आपेगावकर
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- तीन दशकांपासूनच्या अतिक्रमणावर मनपाची कारवाई
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- महत्वपूर्ण निर्णय ! दुसरी पत्नी देखील पतीच्या पेन्शनची वारसदार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

