मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून १११ ॲम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रे आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त काँग्रेसतर्फे चेंबूरच्या नालंदा हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप आदी सहभागी झाले.
यावेळी पटोले म्हणाले, राजीवजींच्या हौतात्म्य दिनी हाच जनसेवेचा वारसा पुढे घेऊन जात काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात १११ ॲम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्र आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राजीव गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी २१ मे हा दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. सध्या कोरोनाचे संकट असल्याने काँग्रेस पक्ष गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे.
मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, कोरोनामुळे दीड वर्षापासून लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या कठीण परिस्थितीतही महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट काम करून देशात आदर्श घालून दिला आहे. केंद्राने या कामात मोकळ्या हाताने मदत केली नाही, लसी कमी पुरवल्या, वैद्यकीय मदत अपुरी केली, तरीसुद्धा नियोजन करून महाराष्ट्राने लसीकरणात देशात आघाडी घेतली. काँग्रेस पक्ष राज्य सरकारसोबत मिळून लोकांना मदत करत आहे. हे मदत कार्य सुरूच राहील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘म्यूकरमायकोसिसचा खर्च महात्मा फुले योजनेत समाविष्ट करा’, खंडपीठाचे सरकारला आदेश
- तेजपाल निकालाविरोधात गोवा सरकार कोर्टात जाणार-मुख्यमंत्री सावंत
- एसटी महामंडळाचे छुपे खासगीकरण? भाडेतत्त्वावर घेणार तब्बल ५०० बस
- ‘तुम्ही आमचा अपमान करत आहात’, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर संताप
- सातव कुटुंबीयांच्या सांत्वनास राहुल गांधी हिंगोलीला येणार


