नवी दिल्ली – एका बाजूला कर्नाटकात कॉंग्रेस सत्ता गमावणार अशी चिन्हे दिसत असताना तिकडे गोव्यात मात्र कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत(बाबू) कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे दहा आमदार पक्षत्याग करून भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या दहा आमदारांमध्ये फ्रान्सिस सिल्व्हेरिया, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, क्लिओफेसिओ डायस, विल्फ्रेड डीसा, नीलकंठ हरळणकर आदींचा समावेश आहे. भाजपप्रवेशाचे नेमके कारण देण्यास कवळेकर यांनी नकार दिला. भाजपची ताकद काँग्रेस आमदारांमुळे आणखी वाढली आहे. काँग्रेसजवळ आता केवळ पाच आमदार उरले आहेत.
एकत्र असलेल्या विरोधी पक्षाच्या भीतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाच्या तोंडावर हे अनैतिकतेचे राजकारण केल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. भाजपला ‘एक देश – एक निवडणूक’ नव्हे तर ‘ एक देश- एक पक्ष’ हवा असल्याचेही ते म्हणाले. ब्लँकमेलिंगसारख्या दबावतंत्राचा अवलंब करून भाजपने काँग्रेसचे 10 आमदार फोडले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरचा हा नवा भारत आहे. अशावेळी देवानेच या देशाचे रक्षण करावे असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,गोव्यातील राजकारण म्हणजे बाजार झाला आहे. काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये जाणे म्हणजे व्यवसाय झाला असल्याची टीका शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शिवसेना पक्षाकडे नवीन पर्याय म्हणून पाहिले पाहिजे नाही तर मुल्याधिष्ठीत आणि आदर्शवादी राजकारणापासून पुढील पिढीला वंचित राहावे लागेल, असेही कामत यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

