Share

‘टीम काँग्रेस’च्या जम्बो कार्यकारिणीसह नानांना शुभेच्छा !’ सामना अग्रलेख

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? हा प्रश्न अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. परंतु शुक्रवारी या संपूर्ण चर्चेवर पूर्णविराम लागला आहे. नाना पटोले यांची कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. काँग्रेसनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. त्यांनतर आजच्या सामना अग्रलेखातून नाना पटोलेंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

‘काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याचबरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरून गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले! नानांना शुभेच्छा!

नाना पटोले यांची अखेर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यासोबत महाराष्ट्रासाठी ‘टीम काँग्रेस’ची जम्बो कार्यकारिणीही जाहीर झाली आहे. या कार्यकारिणीत 5-6 कार्याध्यक्ष, पंधराएक उपाध्यक्ष असा जंगी पसारा दिसत आहे. म्हणजे नाना हे प्रांतिकचे अध्यक्ष झाले, पण त्यांना विभागानुसार नेमलेल्या कार्याध्यक्षांना घेऊन काम करावे लागेल. मुंबईतही भाई जगताप अध्यक्ष व दुसरे एक चरणजितसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून नेमले आहेतच. काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची ही नवी पद्धत स्वीकारली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्याच वेळी काँग्रेस पक्षातील या संघटनात्मक घडामोडींचा अंदाज व्यक्त झाला होता.

नाना पटोले यांनी आता सांगितले आहे की, पक्षाच्या आदेशानुसार आपण काम करू. पटोले यांनी राजीनामा का दिला व पक्षाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी का सोपविली हे काही आता लपून राहिलेले नाही. पटोले यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे. काँग्रेस पक्षात हे फेरबदल अपेक्षित होतेच. त्यांचा तो अंतर्गत मामला आहे. अर्थात बाळासाहेब थोरात जाऊन पटोले येत आहेत एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँगेस पक्षाची अवस्था अशी झाली होती की, राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशा वेळी बाळासाहेब थोरातांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले व अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळविले. आज काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सत्तेतील महत्त्वाचा भागीदार आहे व पक्षाला संजीवनी मिळाली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी जोरदार विजय मिळवला. नागपुरात भाजपला असा धक्का देणे हे ऐतिहासिक आहे. काँग्रेसला गेल्या दीडेक वर्षात महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ आल्याने या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आता स्पर्धाच लागली आहे, पण संकटकाळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची धुरा सांभाळली. नागपुरात विधानसभेचे दोन आमदार निवडून आले. सोनिया, प्रियंका किंवा राहुल गांधींची एखादी सभा झाली असती तर नागपुरात दोनाचे चार झाले असते. ते काही असले तरी आज निदान महाराष्ट्रात तरी काँग्रेस पक्षाची सुकलेली मुळे बहरू लागली आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वातंत्र्य लढय़ाची, सर्वोदय चळवळीची, सहकाराची आहे. काँग्रेसने राजकारणात घराणी आणि पिढय़ा निर्माण केल्या. त्यातील काही घराणी आज भाजपच्या मांडीवर बसलेली दिसत आहेत.

स्वतः नाना पटोले हे मधल्या काळात भारतीय जनता पक्षातच होते. ते तेथून काँग्रेस पक्षात आले व जुन्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तेथे मिसळून गेले. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. नाना हे आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. दिल्लीचा पाठिंबा असल्याशिवाय नानांच्या डोक्यावर हा मानाचा शिरपेच येणे शक्य नाही. ज्याअर्थी विधानसभा अध्यक्षपदावरून नानांना मोकळे केले गेले आणि त्यांच्यावर पक्ष संघटनेची धुरा सोपवली गेली आहे, त्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रात काँग्रेसला एक आक्रमक चेहरा हवा आहे. अर्थात आक्रमण म्हणजे अतिरेक ठरू नये याचा विचारही काँग्रेसने केलाच असेल. राज्यात तीन भिन्न विचारांच्या पक्षांचे सरकार सुरू आहे.

महाराष्ट्रासारख्या राष्ट्रीय पटलावरील महत्त्वाच्या राज्यातून भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याचा चमत्कार तीन-चार पक्षांच्या महाआघाडीने केला. हे सरकार एक महिनाही चालणार नाही, ते अंतर्विरोधाने पडेल वगैरे वल्गना करण्यात आल्या, पण सरकारने एक वर्षाचा टप्पा पार करून पुढची गती घेतली ती तीन पक्षांच्या संयमाने व समन्वयाने. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर सरकारला लोकोपयोगी कामे रेटून नेण्याची पूर्ण सूट दिली आहे. बाळासाहेब थोरातांचा संयम वाखाणण्यासारखा होता. सोनिया गांधींचा समंजसपणा सरकारचा मुख्य आधार आहे. त्यामुळे सरकारने पकडलेली गती थांबली नाही.

तीन पक्षांतला संवाद हीच महाविकास आघाडीची ऊर्जा आहे याचे भान प्रदेश काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांना ठेवावे लागेल. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी छाप पाडली आहे. नाना हे एक लढणारे झुंजार नेतृत्व आहेच. त्यांचा फटकळपणा हीच त्यांची ताकद आहे. त्या फटकळपणाच्या फटकाऱयातून तेव्हा पंतप्रधान मोदीही सुटले नाहीत. नाना हे शेतकरी, कष्टकऱयांचे नेते आहेत व त्यांचा पिंड हा घटनात्मक चौकटीच्या पिंजऱयात बसून काम करणाऱयांचा नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांचा सुवर्ण पिंजरा सोडून ते पक्ष संघटनेत येत आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने हा निर्णय विचार करूनच घेतला असेल. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष अद्यापि मिळू शकला नाही.

गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्या पुढाकाराने 23 नेत्यांनी काँग्रेसला अध्यक्ष द्या, अशी मागणी केलीच आहे. अहमद पटेल यांच्यासारखा मोहरा अल्लास प्यारा झाला आहे. त्यामुळे समन्वयाची भूमिका बजावणारा नेता कोण? हा एक प्रश्न आहेच. ही पोकळीसुद्धा हायकमांड लवकरच भरून काढेल असे दिसते. नाना पटोले यांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेताना आता विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल याचाही विचार काँग्रेसच्या हायकमांडने केलाच असेल. कारण विधानसभा अध्यक्षपदासाठी आता पुन्हा निवडणूक घ्यावीच लागेल व पुन्हा एकदा आकडय़ांची जुळवाजुळव नव्याने करावी लागेल. बहुमताचा आकडा नक्कीच आहे. त्याची चिंता करण्याचे कारण नाही, पण आघाडी सरकारात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुनः पुन्हा निवडणुका टाळणे सगळय़ांच्याच हिताचे ठरत असते.

विरोधकांनी बेडकी कितीही फुगवली तरी त्यांचा बैल होणार नाही हे खरेच, पण तरीही त्यांना हाकारे, उकारे, आरोळय़ा ठोकण्याची संधी का द्यावी? विधानसभा अध्यक्षपद महाआघाडी सरकारच्या वाटाघाटीत काँग्रेसकडे गेले खरे, पण त्या बदल्यात शिवसेनेने आपल्या कोटय़ातले एक जादा मंत्रीपद राष्ट्रवादी काँगेसला दिले. आता शरद पवारांचे म्हणणे पडले की, विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे? यावर तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. एक मात्र नक्की, पवारांच्या भूमिकेत दम आहे. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही.

ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. म्हणजे श्री. पवार यांच्या मनात नेमके काय विचार घोळत आहेत ते पाहावे लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याचबरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरून गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले! नानांना शुभेच्छा !’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!