पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील अनेत नेते मंत्र्यांवर ईडी, सीबीआयने कारवाया केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार ईडी, सीबीआय गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणा की, ज्या पूर्वी लोकांना माहीतच नव्हत्या. त्या यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकार करत आहे. कुणाच्या घरी कधी धाड पडणार हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना आधीच माहीत असते. त्यामुळे सत्ता ही कायम कुणाचीच नसते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सूचक इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
तुम्ही निवडणुकांमध्ये शिवरायांचे नाव घेता आणि संजय राऊत, एकनाथ खडसे यांच्या घरच्यांना ईडी, सीबीआय मार्फत चौकशीसाठी बोलावता, तासन्तास चौकशी करता ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे. आगामी निवडणुकांत महाविकास आघाडी होईल की हे माहीत नाही; परंतु प्रत्येकाने आपली ताकद वाढविली पाहिजे. तेव्हाच अन्य पक्ष तुमच्याशी आघाडीबाबत चर्चेला पुढे येतील, असंही खासदार सुळे म्हणाल्या आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुठल्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही. मुळशीला पिण्याचे पाण्याच्या योजनेबाबत पालकमंत्री अजित पवार स्वतः पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे भविष्यात कितीही नागरीकरण वाढले तरी मुळशीकरांना पाणी कधीच कमी पडू देणार नाही. कोविड काळात जिल्हा परिषद व प्रशासनाने चांगले काम केले आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात नंबर एक ठरला आहे. जिल्हा परिषदेने केलेली कामे पक्ष संघटनेने तळागाळातील लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत. मागच्या सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्री कोण होते हे तरी कुणाला माहीत आहे का? त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्यातील सर्व गावांचा सखोल अभ्यास त्यांना आहे, असं सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच : कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक ताबडतोब बोलावण्याची गुलाम नबी आझाद यांची मागणी
- रस्त्यांच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री
- ‘मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी’, तेच कंत्राटदार, त्याच निविदा ‘सब गोलमाल है’
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल


