सांगली : जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल. राज्यात पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, नद्याजोड उपक्रम या बाबींवर विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेऊनच विकासकामे केली जातील. पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेऊन आराखडा तयार केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, सांगलीतील पुरबाधित भागाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाच्या तीन मागण्या केल्या आहेत. पूरग्रस्त भागाला पुन्हा खंबीरपणे उभे करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहेच असे सांगून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एनडीआरएफचे निकष जुने झाले आहेत. ते बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती केली आहे. व्यापाऱ्यांनी विमा काढला असला तरी विमा कंपन्यांकडून त्यांचा पंचनामा कधी होणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे महसूल विभागाने केले पंचनामे ग्राह्य धरुन तात्काळ 50 टक्के रक्कम अदा करावी. यासोबतच, बँकांचे व्याज दर कमी करावेत. याबाबत निर्देश देण्याचीही केंद्र सरकारला विनंती केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 2019 चा महापूर, कोरोना आणि आता 2021 चा महापूर या सर्व पार्श्वभूमीवर पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. सर्व बाबींचा समतोल राखत जनतेच्या सहभागाने आपण या संकटावरही मात करु.
वारंवार येणारी संकटे पाहता आतापर्यंत विकास करताना काही उणीवा राहिल्या असल्यास कठोरतेने नियमांची अंमलबजावणी करा, ब्ल्यू लाईन, रेड लाईन अशा रेषा किती दिवस काढायच्या ? त्याबाबतच्या नियमांची अंमलबजावणीही होणे आवश्यक आहे. ज्या वस्त्यांमध्ये पाणी वाढत आहे. त्याचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. पुराचे व्यवस्थापन सुनियोजितपणे करणे आवश्यक आहे. सांगली शहरातील शेरी नाल्याचे पाणी अन्यत्र वळविता येईल का यासाठीही विचार व्हावा. विचित्र पद्धतीने पावसाचा पॅटर्न बदलत असून त्यातून कोणीच सुटत नाही. याचा विचार करुन बदलत्या हवामानाबरोबर आपल्या आयुष्यातही बदलाची आवश्यकता भासते आहे, असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.
महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्विन पूल, हरभट रोड, आदी ठिकाणी भेट देऊन पुरस्थितीची माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक यशस्वी ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या मागे पंतप्रधानांचा मोठ्ठा फोटो असतो; भाई जगताप यांची टीका
- बारावीच्या निकालाचं अखेर ठरलं; वाचा कधी आणि कसा पाहता येणार राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या; आज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी घट
- …तोपर्यंत कोरोनापासून कुणीही सुरक्षित असणार नाही – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
