टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण बद्दल सरकार गंभीर नाही तर मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करणं चुकीचं असून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान, सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक झाली असून, सरकार मराठा आरक्षण प्रश्नावर गंभीर नाही जर सरकार खर्च गंभीर असेल विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर करावा अशी सुद्धा मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर आंदोलन चिघळवणाऱ्यांवर कारवाई करावी असा देखील चव्हाण म्हणाले आहेत.
राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.
काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या
- मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
- मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
- राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
- आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
- मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.


