औरंगाबाद : ‘टाचणी पडेल एवढी निरव शांतता असलेली स्मशानभूमी. सगळीकडे भकास आणि उदास वातावरण. आणि यात काळीज पिळवटून टाकणारा नातेवाईकांचा आक्रोश. आपला माणूस जाण्याचं आणि परत कधीही येणार नसल्याचं, ठसठसणारं दु:ख. आता एवढेच वाटते हे सर्व काही थांबायला हवे ‘. सर्व धर्माच्या कोरोना रुग्णांना शेवटचा निरोप देणाऱ्या, सर्व अंतिम संस्कार पार पाडणाऱ्या ‘मस्तान’ ग्रुपचे प्रमुख मोहम्मद मोइन मस्तान बोलत होते. कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्याचे हे दुसरे वर्ष आहे, आणि आता हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे जात असल्याचे सांगतांना त्यांचा स्वर गहिवरून आला.
गेल्या ३५ वर्षांपासून शहरातील ‘मस्तान’ ग्रुप बेवारस मृतदेहांवर अंत्यविधी करण्याचे काम करत आहे. या संस्थेचे प्रमुख मोईन मस्तान आणि त्यांच्या सोबत काम करणारे एकूण २५ सदस्य आहेत. तुम्ही मुस्लिम असुनही हिंदूंवर योग्य पद्धतीने अंतिम संस्कार कसे करता? असा प्रश्न लोक विचारतात, तेव्हा मोईन म्हणतात. ‘हिंदू – मुस्लिम सब एक हि है.’
गुजरात राज्यातून कामाच्या शोधात एक जोडपे आपल्या चार वर्षांच्या मुली सोबत औरंगाबादेत आले होते. मात्र यातील पतीला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे घाटी रुग्णालयात भरती केले. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि या ४५ वर्षीय माणसाचा यात मृत्यू झाला. पत्नीजवळ एक ‘फुटी कवडी’ देखील नव्हती. मागे कुणीच नाही. अशावेळी मस्तान ग्रुप पुढे आला. त्यावेळी आपल्या आयुष्याचा एकमेव आधार गमावलेल्या त्या स्त्रीचा आक्रोश, तिचे जोरजोरात ओरडने, आणि त्या चिमुकलीचा तो चेहरा आजही आठवला तरी अंगावर शहारे उभे राहत असल्याचे मोईन सांगतात.
आतापर्यंत हिंदू, क्रिश्चन, मुस्लिम सर्व धर्माच्या ३ हजार कोरोना बळींचे अंत्यविधी केले आहेत. त्यांची एनजीओ सरकारकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. एक काळ असा होता जेव्हा मृत्यूचे तांडव सुरू होते. त्यावेळी आम्ही ३८ तास, न झोपता देखील काम केल्याचे ते सांगतात. पहिल्यांदा जेव्हा पीपीई किट घातली तेव्हा बीपीचा त्रास झाला.
मात्र आता याची सवय झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सख्खा मुलगा, बायको देखील जवळ यायला तयार होत नाही. त्यावेळी या जगाचा तिरस्कार वाटतो. अरे आज हे गेलेत. उद्या आपला नंबर असेलच ना? आपणही मरणारच. पण माणुसकी तर जिवंत ठेवा. असे म्हणत ते आपल्याला अंतर्मुख करतात.
महत्त्वाच्या बातम्या
- सलाम पुणेकर : सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक !
- शहर विकासावर खा इम्तियाज जलील यांची मनपा आयुक्तांशी चर्चा
- जालन्याचे नाशिक होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करा- आ. लोणीकर
- इंद्राणी मुखर्जीसह ३८ महिला कैद्यांना कोरोना
- दुचाकी चोर छावणी पोलिसांच्या जाळ्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

