Share

Explained | ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्विकारण्यामागे भाजपचा डाव?

Published On: 

🕒 1 min read

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत आज त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही, तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्विकारण्यामागे भाजपचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने महापालिका प्रशासनाला आदेश दिल्यामुळे  ऋतुजा लटके यांचा राजीनामा होल्डवर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात असल्याची चर्चा आधीच महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभेत बोलताना या चर्चेला दुजोरा दिला होता. दरम्यान भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हात धुवून मागे लागली आहे. शिवसेनेचे दोन गट केले, पक्षाचे नाव व चिन्ह गोठवले. आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात येत आहे. त्यांचा राजीनामा अर्ज रोखून धरला आहे.

शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी दबाव-

उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि भाजपवर उमेदवाराला डावलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.  ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावर्षी अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. त्यानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या बृहन्मुंबई कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी आहेत. त्यांनी निवडणूक नियमांनुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.

ऋतुजा लटके यांची उच्च न्यायालयात याचिका-

ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. याप्रकरणी आज (गुरुवार) न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब म्हणाले की, “शिंदे गटाकडून  ऋतुजा लटके यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यांना मंत्रीपद देण्याची ऑफर असल्याचेही आम्ही ऐकले आहे. एक महिना झाला तरी त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला नाही.

भाजपचा डाव यशस्वी होणार?

रमेश लटके यांचा अंधेरी पूर्व मतदार संघात चांगलाच प्रभाव होता. त्यामुळे ऋतुजा लटके यांना ही निवडणूक जिंकणे कठीण नाही. पण भाजपने त्यांचा राजीनामा रोखून धरला तर उद्धव ठाकरे गटाला पर्यायी उमेदवार द्यावा लागेल. त्यानंतर भाजपला ही निवडणूक सोपी जाईल. असेच प्रकरण २०१९ मध्ये लोकसभेच्या अकोला मतदार संघात देखील घडले होते. २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये असाच पेच निर्माण झाला होता. २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून डॉ अभय जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. सध्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या विरोधात काँग्रेसने अभय जैन यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. अभय जैन हे धोत्रे यांना तगडी फाईट देणार होते. याचा अंदाज भाजपला देखील आला होता.

मात्र, डॉ अभय पाटील हे अकोला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिड महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. फडणवीस सरकारमध्ये राजीनामा मंजूर करण्यास विलंब झाला. फडणवीस सरकारने शेवटी अभय पाटील यांचा राजीनामा स्विकारलाचं नाही. त्यामुळे काँग्रेसला वेळेवर उमेदवार बदलावा लागला. ही देवेंद्र फडणवीस यांची खेळी असल्याची चर्चा तेव्हा होती. काँग्रेसने अभय पाटील यांच्या जागी हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपचे संजय धोत्रे, भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यात तिरंगी लढत झाली. निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी बाजी मारली. त्यानंतर डॉ अभय पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. भाजप अशा रणनिती आखण्यात अग्रेसर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सबंध ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याशी जोडला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Explained Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या