औरंगाबाद : १ नोव्हेंबर २००५ नंतर नवीन अंशदायी पेन्शन योजना नियुक्त कर्मचारी वर्गाला लागू झाली. त्यात कर्मचारी मयत झाला तर कपात झालेली रक्कम, तेवढाच शासन हिस्सा आणि त्यावर दरवर्षी मिळणारे व्याज अशी एकूण रक्कम मयत कर्मचारी कुटुंबाला देण्यात येते. जिल्हा परिषदेने नुकत्याच केलेल्या वाटपात घोळ झाला असून संबंधित शिक्षकाच्या कुटुंबाला एका वषार्ची रक्कमच देण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कार्यरत असलेले ९ कर्मचारी मृत पावले. त्यांच्या रकमेचे प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु, त्यांचा नेमका हिशोब किती झालेला आहे. याची खातरजमा न करता अपूर्ण हिशोबाचे विवरण वित्त विभागाने दिले. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाने हा प्रस्ताव जशास तसा शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवला. उपसंचालक कार्यालयाने तो मंजूरही केला. पैठण तालुक्यातील दिवंगत अशोक पंढरीनाथ औटे या शिक्षकाचा ७८ हजार २३ रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला. २०१३ मध्ये ३१ हजार २२६ रुपये कपात झाले.
हिशोब आणि उशिरा शेड्यूल मिळाल्यामुळे २२ हजार ८२ रुपये २०१४ मध्ये जमा झाले परंतु, प्रस्ताव मात्र ३१ हजार २२६ चाच तयार करण्यात आला. जिल्हा परिषदेने पुढील वषार्तील हिशोब असूनही धरलाच नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कसलीही खातरजमा न करता उपसंचालक कार्यालयाकडे डोळे झाकून पाठवलेला प्रस्ताव मंजूरही झाला. शिक्षण विभागाने बजेट मागणी करण्याचे नियोजनही केले.
याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने चौकशी केली असता शिक्षण विभागानुसार, वित्त विभागाने जेवढा हिशोब दिला तेवढा आम्ही पाठवला. यावर संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेकडून असा हिशोब होत असेल तर कर्मचाऱ्यांचे भविष्य कोणाच्या हाती सोपवावे. असा सवाल जुनी पेन्शन हक्क संघटनेने उपस्थित केला. आमच्या पैशांचा व्यवस्थीत हिशोब ठेवला जात नसल्याचा आरोपही जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी सचिन एखंडे, भिमराव मुंडे, गोविंद तोटेवाड, सुनील सलामबाद, धनंजय मिटकरी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शासकीय कामात अडथळा; शिवसेना आ.प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा
- कोरोना, चक्रीवादळ आले पण राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही – अजित पवार
- मराठ्यांनी सरकार चालवणं कठीण होईल असं आंदोलन करावे : नारायण राणे
- औरंगाबादेतील कठोर निर्बंध १ जूनपासून शिथिल करा! आ.चव्हाण यांची ठाकरेंकडे मागणी
- कोरोना काळातही मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही – उद्धव ठाकरे


