🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या अधिक वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकांतात भेटीनंतर भाजप-शिवसेनेच्या युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच सरनाईकांच्या पत्राने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले होते. तसेच, पदोन्नती आरक्षण, स्वबळ आणि इतर काही मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य करताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाजप -शिवसेना युतीचा पुनरुच्चार केला आहे. महाविकास आघडीत मोठे वाद आणि संशयाचं वातावरण असून हे सरकार कधी कोसळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे शिवसेनेनं-भाजपशी युती करावी आणि मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावे, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे.
‘महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या पाठिंब्याने शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार मध्ये अंतर्गत मोठे वाद आणि संशयाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस कधी या सरकारचा पाठिंबा काढेल सांगता येत नाही.किंवा शिवसेना सुद्धा स्वतःहून महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडू शकते अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा पुनर्विचार करून भविष्याचा दूरदृष्टीने विचार करून भाजप सोबत युती केली पाहिजे. अडीच वर्षे भाजप आणि अडीच वर्षे शिवसेना असे मुख्यमंत्री पदाचे वाटप करावे,’ असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गुंठेवारीचे गुऱ्हाळ वर्षानुवर्षे सुरूच, १८ वर्षात औरंगाबादेत केवळ सात हजार ५८९ फायली मंजूर!
- औरंगाबाद जिल्ह्यात खरीप हंगामात ३७७ कोटींचे वाटप!
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका, मनपा करणार बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती!
- औरंगाबादेत लसीकरणाला ब्रेक! बंद केंद्रांसमोर नागरिकांची गर्दी
- जयंत पाटलांना वाटते तेवढी भारतातील लोकशाही कमकुवत आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
