टीम महाराष्ट्र देशा :लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आगामी निवडणुकांसाठी प्रभारी नेत्यांची घोषणा केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कर्नाटकचे माजी आमदार लक्ष्मण सावदी यांना सह प्रभारी बनवण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भूपेंद्र यादव यांच्यावर महाराष्ट्रात भाजपला सत्तेत कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
महाराष्ट्रासह राजधानी दिल्ली, हरयाणा, झारखंड या राज्यातील पक्षातील प्रभारींची निवड करण्यात आली आहे. दिल्लीत प्रकाश जावडेकर, हरयाणात नरेंद्र सिंह तोमर तर झारखंडमध्ये ओम प्रकाश माथूर यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या सर्व नेत्यांवर त्या त्या राज्यात भाजपची कामगिरी सुधारण्याची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, येत्या ऑक्टोबर किंवा नोहेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेचे आयोजन केले होते. परंतु पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ही यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
#कोल्हापूर – सांगली महापूर : ढेपाळलेल्या यंत्रणेवरून संतप्त नागरिकांनी महाजनांना विचारला जाब
महापूर सेल्फीनंतर महाजनांनी पाण्यात उतरून घेतला आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

