टीम महाराष्ट्र देशा- राज्यातल्या पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांची मागणी करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निधीपैकी, पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी चार हजार सातशे आठ कोटी रूपये तर कोकण, नाशिक आणि इतर आपत्तीग्रस्त जिल्ह्यांसाठी दोन हजार एकशे पाच कोटीं रूपये मदतीची मागणी करण्यात येणार आहे.
ही मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारनं पूरग्रस्त महाराष्ट्राला अद्याप कोणतीही मदत दिली नाही, यावरुन महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसते अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यातल्या पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काल मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकची हवाई पाहणी केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यासमवेत सांगली आणि कोल्हापूरचीही हवाई पाहणी केली, असा आरोप त्यांनी केला. शहा यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री का नव्हते, असा प्रश्न उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले शिर्डी संस्थान, १० कोटी रुपयांचा देणार निधी
देशातील पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा : भुजबळ
#महापूर : रुपाली चाकणकर पंकजा मुंडेंवर बरसल्या, म्हणाल्या…


