मुंबई : मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसेने आक्रमकपणे घेतलेली भूमिका व हनुमान चालीसा आंदोलन यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी राज्यभरात अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. आता मात्र एक वेगळी खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एकीकडे हा सर्व गोंधळ सुरु असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिली आहे. यानंतर ठाकरे सरकारने राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केली. या निर्णयावर बाळा नांदगावकर संतापले.
बाळा नांदगावकर म्हणाले, “काय थट्टा चालवली आहे? आम्ही काय मागणी करतोय? अन् तुम्ही सुरक्षा काय देत आहात. एखादा इन्स्पेक्टर किंवा हवालदार फक्त सुरक्षेसाठी वाढवून दिला आहे. ज्याला नाही पाहिजे त्याला संरक्षण देत आहात. ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना संरक्षणाच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता दाखवत आहात.” याचबरोबर, आम्ही देशाच्या गृहमंत्र्याकडे राज ठाकरे यांना झेड प्लसची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना लेखी स्वरुपात पत्र देखील पाठवले आहे, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिली. आता ठाकरे सरकारने याबाबद मोठा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. काल राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती आणि यानंतर अखेर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या –


