औरंगाबाद : पुन्हा एकदा लसींचा साठा संपल्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. गुरुवारी रात्री उशिरा १५ हजार लसींचा साठा मनपास प्राप्त झाला. मात्र दोनच दिवसात हा साठा संपला. त्यामुळे लसीकरण मोहीम पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. यापूर्वी देखील चार दिवस लस शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद होते. आता पुन्हा एकदा नव्याने लसींचा पुरवठा कधी होईल, याबाबत काहीही सांगता येणार नाही. जोपर्यंत राज्य शासन लसींचा साठा सुरळीतपणे करत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहिल. अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
औरंगाबाद शहरात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. अलीकडे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच पालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वेग आला होता. पालिकेने शहरात ११५ वॉर्डात जागोजागी केंद्र सुरू करून लसीकरण करण्यावर जोर दिला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींचा साठा मुबलक असल्याने ७५ ते ८० हजारापर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दिवसभरात १० ते १२ हजार नागरिकांचे लसीकरण होत होते.
लसीकरणाला तरूणांचा भरघोरस प्रतिसाद मिळाल्याने लसींचा साठा पाच दिवसातच संपला. लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण बंद पडले होते. त्यानंतर चार दिवसात १५ हजार लसींचा साठा आला. तीन दिवसांपासून लसीसाठी चकरा मारून हैराण झालेल्या नागरिकांसाठी लस उपलब्ध झाल्याने लसीकरण केंद्रावर एकच गर्दी झाली. दिवसभरात ११ हजार ८०० लसी संपल्या. त्यामुळे शनिवारसाठी (दि. ३) तीन हजार २०० लसी उपलब्ध राहिल्या. शनिवारी दुपारपर्यंत हा साठाही संपल्याने शनिवारनंतर लसीकरण बंद पडले आहे.
मागणी एक लाखांची, पुरवठा हजारांमध्ये
पालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाकडे एक लाख लस मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र अजूनही लस मिळालेली नसून कधी मिळेल, याची देखील शाश्वती नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले. मात्र कोवॅक्सिनचा आधीचा साठा आणि नंतर आलेल्या दोन हजारांच्या साठ्यातून शहरातील राज नगर, क्रांती चौक, एमआयटी हॉस्पिटल याठिकाणी काही प्रमाणात लसीकरण सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्धीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करणारे सरकार तिजोरीत खडखडाट असल्याचा कांगावा का करत आहे ?
- सई ताम्हणकरचा ‘देसी लुक’ पाहून अनेकजण झाले घायाळ; पहा फोटो
- भाजपची गुंडगिरी खपवून घेणार नाही, नवाब मलिकांचा थेट इशारा
- राज्य सरकारकडून वारकऱ्यांचा छळ करून अटक, ही बाब निंदनिय: खा. इम्तियाज जलील
- ‘माझ्या घोषणांमुळे उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्या म्हणून माझे निलंबन’; राम सातपुतेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

