नागपूर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी साठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
ऑक्सिजन तुटवड्याच्या अशा परिस्थितीत नागपुरात येत असलेले ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र एका व्यवसायिकानं दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला आहे. नागपूरला ऑक्सिजनची नितांत गरज असल्यानं अशमी ट्रान्सपोर्टचे संचालक प्यारे खान यांनी ४ टँकर्सची व्यवस्था केली. खान यांनी सीएसआरच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकरची सोय केली. हे टँकर छत्तीसगडच्या भिलाईहून निघाले होते. मात्र त्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्यानं खान यांनी ऑक्सिजन टँकर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना तांत्रिक बिघाड झाल्यानं विलंब होत असल्याचं सांगितलं.
ऑक्सिजन टँकर्स येण्यास बराच उशीर होत असल्यानं खान यांनी तातडीनं त्यांची एक टीम टँकर अडकून पडलेल्या ठिकाणी पाठवली. त्यावेळी एक धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली. चारही टँकर्स गुजरातमधील अहमदाबादच्या दिशेनं निघाले होते. यासंदर्भात प्यारे खान यांनी ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. मात्र त्यांनी आधी टाळाटाळ केली आणि नंतर उत्तरं देणंच बंद केलं. त्यामुळे खान यांनी सूत्रं हलवली आणि चारही टँकर्स रोखण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीला अधिकची रक्कम मिळत असल्यानं त्यांनी चारही टँकर्स परस्पर अहमदाबादला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं खान यांना समजलं. या चारपैकी दोन टँकर्स औरंगाबादजवळ पोहोचले होते. तर इतर दोन टँकरही त्याच दिशेनं निघाले होते. मात्र खान यांनी चारही टँकर्स वळवायला लावले. यापैकी दोन टँकर्स नागपुरला पोहोचले असून उर्वरित २ टँकर्स थोड्याच वेळात नागपुरला पोहचाणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे – अजित पवार
- चीन्यांमुळे आणखी एक संकट; अनियंत्रित रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता !
- तामिळनाडूमध्ये स्टॅलीन यांच्या मंत्रिमंडळात गांधी, नेहरूंना संधी !
- ‘अजितदादा धडाडीचे नेते पण उपमुख्यमंत्री झाल्यावर ते का बदलले हे मला समजत नाही’
- ‘ज्येष्ठ नेते मराठा आरक्षणाच्या निकालावर साधं एक स्टेटमेंटही का देत नाहीत ?’


