🕒 1 min read
महाबळेश्वर : सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस काल आंबेनळी घाटात तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळली आणि 33 जणांचा जागीच मृत्यू झाला. आतापर्यंत 25 जणांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत. घटनास्थळी ट्रेकर्स आणि एनडीआरएफकडून दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, खिडकीतून बाहेर फेकले गेल्याने वाचलेले प्रकाश सावंत देसाई यांनी दरीतून वर येऊन माहिती दिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात आली. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सर्व मृत कर्मचारी दापोली व चिपळूण तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे या भागात शोककळा पसरली आहे. शनिवार, रविवार अशी सलग दोन दिवस सुट्टी असल्याने कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस घेतली होती. एकूण ३२ कर्मचारी, दोन चालक, वाहक असे 34 जण सकाळी 7 च्या सुमारास निघाले. आंबेनळी घाट पायथ्याच्या धबधब्याजवळ त्यांनी बस थांबविली. तेथून ते महाबळेश्वरकडे निघाले.
चालक प्रशांत भांबेड बस चालवत होता. धुके असल्यामुळे बसचा वेगही फारसा नव्हता. बसमध्ये सर्वजण हास्यविनोदात मग्न होते. चालक भांबेडही त्यात सहभागी होते. अशाच एका विनोदावर त्याने काही क्षणासाठी मागे वळून पाहिले आणि तिथेच घात झाला. बस दाभिक टोकाजवळ उजव्या बाजूला आठशे फूट दरीत कोसळली. गाडीच्या काचा फुटून अनेक जण बाहेर फेकले गेले, तर काही जण बसखाली दबले गेले.
कृषी विद्यापीठाचे सहायक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई बसच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले आणि बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर झाडांचा आधार घेत ते दरीतून वरती आले. त्यांनी मोबाइलवरून विद्यापीठात फोन करून अपघाताची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल विद्यासागर राव यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
तीन वर्षाच्या अपयशी कारभारातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप सत्तेबाहेर– नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

