कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आजरा तालुक्यातील मौजे आर्दाळ येथे जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्यावतीने आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जयंत पाटील यांनी पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्याची सोय होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश येऊन आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचा लाभ घेऊन येथील शेतकरी या भागाचं सोनं करतील, असा विश्वास व्यक्त करुन या प्रकल्पासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना धन्यवाद दिले. मेघोली धरण फुटल्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी चिंता करु नये, असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
जलसंपदा विभागाचे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी, सर्पनाला, नागणवाडी, उचंगी व सोनुर्ले हे सर्व प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले असून यासाठी गतीने कार्यवाही केली जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जलसंपदा विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील वेळोवेळी बैठका घेऊन त्यासाठी पाठपुरावा करतात. यामुळे जलसंपदा विभागाचे राज्यातील सर्व प्रकल्प लवकरच मार्गी लागून शेतकऱ्यांची सोय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आंबेओहोळ प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांबरोबरच पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण दूर होण्यास निश्चित मदत होईल, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले. रिक्षा, ट्रक, टॅक्सी ड्रायव्हर, शेतमजूर आदी घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्यादृष्टीने यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन होण्याबाबत गणेशोत्सवानंतर बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ३३.८४ चौरस किलोमीटर असून एकूण पाणीसाठा ३५.११ दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठा ३२.६३ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामुळे ३ हजार ९२५ हेक्टर क्षेत्र ( ६ हजार ३५९ हेक्टर सिंचन क्षमता ) सिंचनाखाली येणार आहे. धरणाची लांबी २२५० मिटर आहे. यामुळे आजरा व गडहिंग्लज या दोन तालुक्यातील २१ गावांना लाभ होणार आहे, असेही महेश सुर्वे यांनी सांगितले. आभार कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी मानले. आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी योगदान दिलेल्या अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार संजय पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

