🕒 1 min read
सिंधुदुर्ग : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. हे सरकार आल्यानंतर कधी काळी मैत्री असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला पाहायला मिळालं आहे.
शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संघर्ष वाढला आहे. तर, टीका-टिप्पणी, विरोध अशा वातावरणात देखील दिग्गज नेत्यांनी पक्षभेद बाजूला सारून मैत्री कायम ठेवल्याचं दिसून येतं. दरम्यान, शिवसेनेपासूनच राजकीय कारकीर्द सुरु झालेल्या राणे कुटुंबीयांची पुढे शिवसेनेशी कटुता निर्माण झाली. नारायण राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेस नंतर स्वतःचा पक्ष आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी देखील भाजपची वाट धरली.
आता शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यापासून राणे कुटुंबीय हे शिवसेनेसह महाविकास आघाडी विरोधात कमालीचे आक्रमक झाल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चक्क भाजप आमदार नितेश राणे यांची पाठ थोपटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
झालं असं की, सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, विनायक राऊत, नितेश राणे उपस्थित होते. हे नेते एकाच मंचावर येणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. दरम्यान, ‘पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून काम करु,’ असं विधान नितेश राणे यांनी आपल्या भाषणात केलं.
‘सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,’ असं नितेश राणेंनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल.’ त्यांच्या या भाषणानंतर उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु असतानाच राणे आपल्या जागेवर जाऊन बसले आणि विनायक राऊत यांनी त्यांची पाठ थोपटली. त्यामुळे युतीबाबत अजूनही दोन्ही पक्षांमधील काही नेते हे इच्छूक असल्याचे तर्क लावले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात कोरोना रुग्णांची वाढ कायम; आजही कोरोनामुक्तांचा आकडा कमी
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘ते जर अमजद खान असतील तर…’ ; आशिष शेलारांचा पटोलेंना टोला
- काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु करा अन्यथा…’ ; दरेकरांचा सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

