नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे देशातील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गेल्याने राज्यातील ओबीसी समाज नाराज आहे. अनेक प्रयत्ना नंतरही ओबीसी आरक्षण टिकवता आलेले नाही. त्यामुळे आरक्षण लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार येत्या सोमवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 23 मार्चला दिल्लीतील जंतर मंतर येथे देशभरातील ओबीसी नेते आणि कार्यकर्ते धरणे आंदोलन करणार असल्याचा निर्णय राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी तसेच आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द करून केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे, या मागण्या असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी सांगितले आहे. सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीमध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबरोबरच ओबीसी वसतिगृह व इतर समस्यावर देखील चर्चा करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

