🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच पक्षांतर करणाऱ्यांच्या यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भर पडली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांसह जिल्हा परिषदेतील विविध समित्यांचे आजी-माजी सभापती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाण्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे. तसेच ठाण्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार, दोन माजी आमदारांसह शिवसेनेचेही एक माजी आमदार भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे पदाधिकारी शनिवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधून घेणार आहेत. शहापूरमधील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपला पसंती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेगाभरती १ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी ठाण्यातील किमान ४५ नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप ठाण्यात आणखीच मजबूत होणार आहे. तर राज्यातील इतर भागांप्रमाणे राष्ट्रवादी ठाण्यातही कमजोर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
- पुढील २५ वर्षे आमचीचं सत्ता, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
- महाराष्ट्र कॉंग्रेसमधील ‘हा’ दिग्गज नेता करणार घरवापसी
- तुमच्या सर्वांची ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करा : जयंत पाटील
- राज्यात पुन्हा युतीचचं सरकार येणार : फडणवीस


