🕒 1 min read
मुंबई : ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून परप्रांतीयांच्या मुद्द्यावर भाष्य केले असून यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे. भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी राऊत म्हणाले की,’महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. तशी ती आता फुटलेली दिसत आहे. परप्रांतीयांचा विषय हा फक्त एखादे राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा राहिलेला नाही. तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. भूमिपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले’
दरम्यान, पुढे राऊत म्हणाले की,’नक्की परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत’.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- वेळ गेलेली नाही, अजूनही शिवसेना-भाजपची युती होऊ शकते; आठवलेंना विश्वास
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- बाप्पा चालले गावाला… श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचे विसर्जन उद्या ‘या’ वेळी होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
