मुंबई – महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नसल्याचं राज्यातल्या 30 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या उच्चस्तरीय केंद्रीय आरोग्य पथकांना या सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून आलं आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत या पथकांनी व्यक्त केलं असून विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या आरोग्य सेवा आणि प्रशासनातल्या त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची सूचनाही केली आहे.
या पथकांकडून केंद्राला राज्यातल्या 30 जिल्ह्यांमधल्या कोविड स्थितीबाबतचा दैनंदिन अहवाल पाठवला जातो. या अहवालातील गंभीर दखल घेण्याची गरज असलेल्या नोंदी केंद्रीय आरोग्य सचीव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचीव डॉक्टर प्रदीप व्यास यांना पत्राद्वारे कळवल्या असून त्यात नमूद केलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ सुरूच आहे. रुग्ण वाढीत फारशी घट झाली नसूनही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवबाधितांच्या संख्येच्या जवळपास बरोबरीत आल्यानं शनिवारी मिळालेला दिलासा 24 तासही टिकला नाही. काल नवबाधितांच्या दैनंदिन संख्येचा नवा उच्चांक नोंदवला गेला आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्याही शनिवारपेक्षा बरीच कमी होती.
दैनंदिन बाधितांची संख्या काल प्रथमच 60 हजाराच्या पुढे गेली. काल राज्यात 63 हजार 294 नवे कोरोनाबाधित आढळले. ही संख्या पहिल्या लाटे मध्ये सप्टेबरच महिन्यात नोंदवल्या गेलेल्या उच्चांकापेक्षा दुप्पट आहे. तुलनेत काल राज्यात 34 हजार 8 रुग्णच बरे झाले त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेपाच लाखाच्या पुढे गेली. दैनंदिन मृत्यूसंख्याही आता साडेतीनशेच्या जवळ पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेंकटेश प्रसादच्या उत्तराने पाकिस्तानी ट्रोलरची बोलती बंद
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत


