🕒 1 min read
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त सामनातून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते . त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतने देशाच्या स्वातंत्र्याबाबद वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचाही आजच्या अग्रलेखातून समाचार घेण्याता आला आहे. ‘लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते’. असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण आज आपण करीत आहोत. देशाची एकंदरीत स्थिती अशी झाली आहे की, ‘आज शिवसेनाप्रमुख हवेच होते’ असे जनतेला प्रकर्षाने वाटते. संकटाचे वादळ घोंघावू लागले, राष्ट्राच्या छपरावरची कौले उडू लागली की, लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर हल्ले झाले. हिंदू वस्त्या, मंदिरांची तोडफोड झाली. त्यानिमित्ताने त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्याकांनी आंदोलने केली. त्या आंदोलनांमुळे मुंबईतील कुण्या एका रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला. रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही. तरीही त्रिपुरातील घटनेवरून महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच. त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली. बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्यांची ‘बंद’ची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते. असेही सामनातून म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-न्यूझीलंडचा आज पहिला टी-२० सामना; रोहित-राहुल पर्व सुरु
- इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, लक्ष्य सेनची विजयी सुरुवात
- मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा: विदर्भाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
- टीम इंडियामध्ये कोहलीच्या भूमिकेबाबत रोहितचे स्पष्टीकरण; म्हणाला..
- आम्ही राज्यातील हिंदूंची अवहेलना थांबविणार; सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांना टोला

