🕒 1 min read
देगलूर – भारतीय जनता पार्टी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक जिंकेल आणि विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीला दाखवून देईल की, तुम्ही कितीही पक्ष एकत्र आलात तरी भाजपा, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य मिळून आम्ही विजयी होऊ. या मतदारसंघातील भाजपाच्या विजयाने राज्यातील राजकीय परिवर्तनाचा वेग वाढेल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देगलूर येथे व्यक्त केला. निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.
भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या औपचारिक स्वागतासाठी आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील गोजेगावकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, माजी आ. गंगाराम ठक्करवाड आणि भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछेडे उपस्थित होते. मेळाव्याला पक्षाचे बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आणि पन्ना प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वप्रथम उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतली आहे. भाजपाने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. राज्यातील पंधरा हजार ग्रामपंचायतींपैकी साडेसहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या. देगलूर बिलोलीची जागा जिंकून आपल्याला महाविकास आघाडी सरकारला दाखवून द्यायचे आहे की, तुम्ही तिघे एकत्र आलात तरी तुम्हाला पराभूत करू. या मतदारसंघात सुभाष साबणे यांना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार आहे. देगलूर बिलोलीचा निकाल राज्यातील परिवर्तनाची गती वाढवेल.
ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाच्या युतीला पूर्ण बहुमताने विजयी केले. पण विश्वासघातामुळे भाजपा सत्तेपासून दूर राहिली. मतदारांचा विश्वासघात करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे ते लोकांची कामे करत नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनला हेक्टरी साठ हजार रुपये तर ऊसाला हेक्टरी एक लाख रुपये मदत करा, अशी भाजपाची राज्य सरकारकडे मागणी आहे. नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यात निवडणूक आचारसंहितेचा अडथळा नसतो. त्यामुळे या मदतीचा आदेश ताबडतोब काढला पाहिजे. भाजपाच्या सरकारने २०१९ च्या आदेशानुसार जशी मदत केली होती तशी मदत करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या
- घटस्थापनेला राज्यभर आनंदोत्सव साजरा करत दर्शनाला जाणार – आचार्य तुषार भोसले
- ‘देशासाठी मोठा त्याग करणाऱ्या कुटुंबातील प्रियंकांचा गुन्हा काय?’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
